अधिवेशनापूर्वी आंदोलकांशी चर्चा करा
सभापती होरट्टी यांचा सरकारला सल्ला : तरच ज्वलंत समस्यांवर अर्थपूर्ण चर्चा होणे शक्य
बेळगाव : सुवर्णविधानसौध येथे दि. 4 ते 15 डिसेंबरपर्यंत 10 दिवस राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन भरविले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद सभापती बसवराज होरट्टी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र पाठवून आंदोलन करणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करावी, असे पत्राद्वारे कळविले आहे. अधिवेशनात गंभीर विषयांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. आंदोलनांमुळे वाया जाणारा वेळ सभागृहात विविध विषयांवर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी सार्थकी लावावा, असा सभापतींनी सरकारला सल्ला दिला आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकरी संघटना, शैक्षणिक संघटना आदींकडून धरणे सत्याग्रह व आंदोलने केली जातात. यामुळे सरकारच्या प्रतिनिधींना आंदोलनस्थळी जावे लागते. यासाठी सरकारने या आंदोलनांची संख्या कमी करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करण्याची सूचना केली आहे.
सभापतींनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह कृषीमंत्री एन. चलुवरायस्वामी, महसूल मंत्री कृष्ण बैरेगौड, शिक्षणमंत्री एस. मधुबंगारप्पा यांनाही पत्र पाठविले आहे. अधिवेशनकाळात विविध संघटनांकडून मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलने हाती घेतली जातात. यासाठी संबंधित मंत्र्यांनी आंदोलकांच्या प्रतिनिधींची, नेत्यांची बैठक घेऊन मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी चर्चा करावी. याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना आंदोलन करणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करण्यास सूचना करावी, असेही कळविले आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान सुवर्णविधानसौधच्या परिसरात आंदोलकांची संख्या कमी झाल्यास सभागृहामध्ये जनसामान्यांच्या आणि ज्वलंत समस्यांवर अर्थपूर्ण चर्चा करण्यास शक्य होणार आहे. गंभीर विषयांवर चर्चा करून त्यावर तोडगा काढणे शक्य होणार आहे. यामुळेच उत्तर कर्नाटकात भरविण्यात येणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाला अर्थप्राप्त होणार आहे. यामुळे सरकारलाही गौरव मिळेल, चांगले नाव मिळेल, असे विधानपरिषदचे सभापती बसवराज होरट्टी यांनी पत्राद्वारे कळविले आहे.