तालिबान दिल्लीत नियुक्त करणार राजदूत
वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणिस्तानने पाकिस्तानचे पंतप्रधना शाहबाज शरीफ आणि सैन्यप्रमुख आसिम मुनीर यांना आणखी एक झटका दिला आहे. तालिबानने भारतासोबत मैत्रीचे आणखी एक पाऊल उचलत नवी दिल्लीत राजनयिक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या प्रारंभी आणखी एका राजनयिकाची नियुक्ती केली जाणार असे तालिबानकडून भारतीय अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. चालू वर्षात अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील संबंधांमध्ये सातत्याने प्रगती झाली असून याच्याच परिणामादाखल मागील महिन्यात तालिबानचे विदेशमंत्री आमिर खान मुत्तकी यांचा भारत दौरा पार पडला होता. भारताने अफगाणिस्तानला सहाय्य आणि वैद्यकीय पुरवठा जारी ठेवत एक विश्वसनीय भागीदाराच्या स्वरुपात स्वत:च्या भूमिकेला आणखी मजबूत केले आहे.
मुत्तकी यांच्या दौऱ्यादरम्यान भारताने काबूलमधील स्वत:च्या टेक्निकल मिशनला दूतावासाचा दर्जा देत तालिबानी राजनयिकांना स्वीकार करण्यावर सहमती व्यक्त केली होती. दोन्ही देशांकडून स्वत:च्या मिशनचे नेतृत्व करण्यासाठी लवकरच एक प्रभारी नियुक्त केला जाण्याची अपेक्षा आहे.
भारताच्या मदतीचे कौतुक
भारताकडून 16 टनापेक्षा अधिक वेक्टरजन्य रोगप्रतिबंधक औषधे पुरविण्यात आल्याप्रकरणी तालिबानच्या प्रवक्त्याने भारताचे कौतुक केले. ही नवीन मदतसामग्री अफगाणिस्तानसोबत भारताची दीर्घकालीन भागीदारी आणि विकासात्मक सहकार्याला अधोरेखित करते. आवश्यक वैद्यकीय पुरवठा प्रदान करत भारत या क्षेत्रात आरोग्य, स्थिरता आणि मानवीय सहकार्याला चालना देण्यास एक विश्वसनीय भागीदाराच्या स्वरुपात स्वत:च्या भूमिकेची पुष्टी करत असल्याचे तालिबानने म्हटले आहे.
काश्मीरप्रकरणी भारताचे समर्थन
मुत्तकी यांच्या दौऱ्यादरम्यान तालिबानने जम्मू-काश्मीरवरील भारताच्या सार्वभौमत्वाचे समर्थन केले होते. भारताने देखील अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे दृढते समर्थन केले आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील संबंध अत्यंत बिघडले आहेत. दोन्ही देशांदरम्यान हिंसक संघर्षही झाला असून यात अनेक जणांचा मृत्यूही झाला आहे. दोन्ही देशांदरम्यान युद्धविराम झाला असला तरीही तणाव वाढण्याचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. तालिबानने पाकिस्तानवर अफगाणिस्तानात अराजकता फैलावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.