तलाठी नोकरी, नको रे बाबा ...
सांगली :
महसूल विभागात तलाठ्याच्या नोकरीला विशेष ओळख आहे. परंतू सांगली जिल्हा महसूल विभागात दीड वर्षापूर्वी ११० रिक्त पदांसाठी झालेल्या तलाठी भरतीत वेगळाच अनुभव आला आहे. तब्बल चाळीसहून अधिक पात्र उमेदवारांनी या नोकरीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. निवड यादी जाहीर होऊन वर्ष उलटले तरी पात्र यादीतील उमेद्वार हजरच न झाल्याने वेटिंग लिस्टवरील उमेदवारांना शोधून नियुक्त्या देण्यात येत आहेत. तरीही काही राखीव जागा रिकाम्याच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एरव्ही सरकारी नोकऱ्यांसाठी उड्या पडणारा युवा वर्ग 'तलाठी नोकरी नको रे बाबा' असे म्हणू लागल्याने महसुलचे काम वाढले आहे.
अनेक वर्षे भरतीच नसल्याने रपर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही तलाठी भरती परीक्षा दिली होती. दरम्यानच्या काळात या निवड यादीतील उमेदवार विविध विभागात भरती झाले. परिणामी वर्ष संपून गेले तरी यातील चाळीसहून अधिक उमेदवार हजरच झाले नाहीत. आपल्याला या नोकरीची गरज नसल्याचे कळवत नाहीत. त्यामुळे वेटिंग लिस्टमधील उमेदवारांना बोलावण्याचे प्रयत्न महसुलमध्ये सुरू आहेत.
- काही जागा रिक्तच राहणार
वेटिंग लिस्टमधील बऱ्याच पात्र उमेदवारांचे भ्रमणध्वनी बदलले आहेत. तरी काहीजण मेलही पाहत नाहीत. त्यामुळे या उमेदवारांचा शोध घेणे जिकीरीचे झाले आहे. आता शासनाने १३ सप्टेंबर पर्यंत तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. राखीव प्रवर्गातील काही पदे रिक्तच राहण्याची शक्यता आहे.
- तृतीयपंथीयासाठी एक जागा राखीव
भरती प्रक्रिया सुरू असताना एका तृतीयपंथीयाने आपल्यासाठीही जागा राखीव असाव्यात यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने तृतीयपंथीयासाठी एक जागा राखीव ठेवण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले. परंतू आदेश नसल्याने अद्याप नियुक्ती देण्यात आली नसल्याचे समजते.