For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दहशतवाद्यांवर कारवाई करा, पाकला अप्रत्यक्ष संदेश

06:51 AM Apr 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
दहशतवाद्यांवर कारवाई करा  पाकला अप्रत्यक्ष संदेश
Advertisement

वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ

Advertisement

संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेने पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याची कठोर शब्दांमध्ये निंदा  केली आहे. परिषदेच्या सदस्यांनी दहशतवादी कारवायांमध्ये सामील गुन्हेगार आणि दहशतवादाला बळ पुरविणाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार असल्याचे म्हटले आहे. सुरक्षा परिषदेची ही भूमिका पाकिस्तानच्या विरोधात कठोर संदेश असल्याचे मानले जात आहे.  पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना जीव गमवावा लागला होता.

दहशतवाद स्वत:च्या सर्व रुपांमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी धोका आहे. पहलगाम येथील हल्ल्याचे पीडित, भारत आणि नेपाळ सरकारसोबत आम्ही उभे आहोत असे सुरक्षा परिषदेने एक वक्तव्य जारी करत म्हटले आहे.

Advertisement

सुरक्षा परिषदेने सर्व सदस्य देशांना आंतरराष्ट्रीय कायदे आणि सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांनुरुप निर्धारित जबाबदाऱ्यांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणांसोबत (प्रासंगिक)  सक्रीय स्वरुपात सहकार्य करण्यावर भर दिला आहे. कुठलेही दहशतवादी कृत्य गुन्हेगारी स्वरुपाचे असून त्याला न्यायसंगत ठरविले जाऊ शकत नाही, भले मग ते कुणी कुठेही, कुठल्याही उद्देशाने केलेले असो. दहशतवादी हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी निर्माण झालेल्या धोक्यांना सर्व देशांनी सामोरे जाण्याची गरज असल्याचे सुरक्षा परिषदेने म्हटले आहे.

महासचिवांकडून हल्ल्याची निंदा

संयुक्त राष्ट्रसंघ, आंतरराष्ट्रीय कायदे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायदे, आंतरराष्ट्रीय शरणार्थी कायद्यांच्या अनुरुप दहशतवादाच्या विरोधात कारवाई करण्यात यावी असे सुरक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुतेरेस यांनी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची निंदा केली. सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करत करण्यात आलेल्या हल्ल्यांना कुठल्याही स्थितीत सहन केले जाऊ शकत नाही. संयुक्त राष्ट्रसंघ प्रमुख म्हणून माझा भारत किंवा पाकिस्तानशी संपर्क झालेला नाही, परंतु वर्तमान स्थितीमुळे मी चिंतेत आहे आणि घडामोडींवर नजर ठेवून आहे. भारत आणि पाकिस्तानने अधिक संयम बाळगावा आणि स्थिती बिघडणार नाही हे सुनिश्चित करावे असे गुतेरेस यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.