संसदेबाहेर प्रतिकात्मक ‘देणगी अपहार’
विरोधकांकडून अयोध्येतील मुद्दा उपस्थित : अनोख्या पद्धतीने आंदोलन
► वृत्तसंस्था
नवी दिल्ली
प्रश्नपत्रिका फुटीच्या मुद्यावर सरकारला कोंडीत पकडल्यानंतर विरोधी पक्ष पुन्हा एकदा राम मंदिरातील देणगी चोरीच्या मुद्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याच्या प्रयत्नात दिसून आले. शुक्रवारी संसद भवन परिसरात एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षाचे खासदार राम मंदिरातील देणगी चोरीविरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन करताना निदर्शनास आले. यावेळी विरोधी पक्षांच्या खासदारांनी ‘अमित शाह संसदेतून का गायब आहेत?’ असे लिहिलेले फलकही हातात घेतले होते.
विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद भवन परिसरात पथनाट्या सादर करून राम मंदिरातील देणगी चोरीवर एक छोटे सादरीकरण केले. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही यात सहभाग घेतला. याप्रसंगी खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात देणगी पेटी घेऊन आले होते. विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) जोरदार निशाणा साधला आणि याप्रकरणी संसदीय चर्चा व उत्तरदायित्वाची मागणी केली. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी अपहाराच्या निषेधार्थ शुक्रवारी संसद परिसरात विरोधी पक्षांच्या खासदारांनी आंदोलन केले. आमचे आंदोलन प्रतिकात्मक होते. अयोध्येत होणारी लूट उघडकीस आणणे हा त्याचा उद्देश होता, असे सपा खासदाराने स्पष्ट केले.
पप्पू यादव देणगी चोराच्या वेशात
संसदेबाहेरील पथनाट्यात बिहारमधील पूर्णियाचे अपक्ष खासदार राजेश रंजन म्हणजेच पप्पू यादव एका पुजाऱ्याच्या वेशात दिसले. पुजाऱ्याचा वेश धारण करून पप्पू यादव संसद भवनाच्या मकरद्वारात आले. ते त्याठिकाणी काही वेळ दानपेटीसमोर बसले. सपा खासदार डिंपल यादव यांनी दानपेटी त्यांच्याजवळ ठेवल्यानंतर थोड्याच वेळात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तिथे आले आणि त्यांनी पेटीत काही पैसे टाकले. त्यापाठोपाठ इतर अनेक विरोधी खासदारांनीही त्यांचेच अनुकरण केले.
दोन्ही सभागृहात गदारोळ
राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या खासदारांनी दानपेटीत देणगी जमा केल्या. दरम्यान, लोकसभेचे कामकाज सकाळी 11 वाजता सुरू झाले, परंतु विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे ते दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. दुपारी 12 वाजता कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर लोकसभेने जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) विधेयक, 2026 आवाजी मतदानाने मंजूर केले. आता लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज 3 ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
जितेंद्र सिंह यांच्याविरोधात काँग्रेसचा हक्कभंग प्रस्ताव
दरम्यान, काँग्रेसने केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या संसदेतील वक्तव्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे. जंतरमंतरवर आणि संसद मोर्चादरम्यान आंदोलकांवर गोळीबार झाला नव्हता, असा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर काँग्रेसने केंद्रीय मंत्र्यांविरोधात शुक्रवारी हक्कभंग प्रस्ताव मांडला.