दलदल, असह्य दुर्गंधी, भटक्या कुत्र्यांची दहशत
कोल्हापूर / दीपक जाधव :
महापालिकेच्या कचरा प्रकल्पावर सकाळपासून सायंकाळपर्यंत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिकेकडून कोणतीही सुविधा दिलेली नाही. रस्त्यावर दलदल, घोंगावणाऱ्या माशा, सहन न होणारी दुर्गंधी आणि भटक्या कुत्र्यांची दहशत ही स्थिती आहे. महापालिकेच्या कसबा बावड्यातील झूम प्रकल्पावर ऑन द स्पॉट पाहणी केली असता. महापालिकेचा रोज सुमारे दोनशे टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प दिमखातच सुरू आहे. या ठिकाणी कचऱ्याच्यावर प्रक्रियासह इतर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ना हँडग्लोज..ना मास्क..ना पायात बुट.. अशी अवस्था आहे. परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे.
सर्वत्र कचरा आणि फक्त कचऱ्याचे ढीग असलेल्यां ठिकाणी सर्वसामान्य व्यक्तीला पाच मिनिटंही थांबणे शक्य होणार नाही. इतकी प्रचंड दुर्गंधी आणि घोंगावणाऱ्या माशांच इथे साम्राज्य आहे. शहराच्या कानाकोपऱ्यातून कचरा घेऊन येणारी महापालिकेच्या टिपर गाड्या येत असत. प्रकल्पस्थळी घेऊन आलेला कचरा ओला-सुका असे कोणतेही वर्गीकरण न करता एकत्र डंप केला जातो. त्या कचऱ्यावर वर्गीकरणाची प्रक्रिया केला जाते. जेसीबी मशिनच्या मदतीने हाच कचरा बेल्टवर टाकण्यात एक कर्मचारी व्यस्त असलेला दिसतो. पुढे त्या कचऱ्यातून प्लास्टिक, भंगार गोळा करणाऱ्या महिलांची लगबग असते. लाईन बझार, कसबा बावडा येथील महापालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पातील हे रोज दिसणारे भयावह असे चित्र आहे.
या प्रकल्पावर दररोज सुमारे 200 टनाहून अधिक कचरा जमा होतो. आणि यातील अवघा 20 टन कचऱ्यावर कशीबशी प्रक्रिया केली जाते. प्रकल्पस्थळावर येणारा कचरा आणि प्रक्रिया होणारा कचरा यातील तफावतीमुळे सध्या प्रकल्प स्थळावर लाखो टन कचरा प्रक्रियेच्या प्रतीक्षेत पडला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या पावसाचे दिवस असून परिसरात दुर्गंधी, दलदल आणि माशाचे साम्राज्य पसरले असून स्थानिक नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. येथील कचऱ्याला पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर आग लागली होती. ती आग तब्बल पंधरा दिवसतरी धुमसत होती. कचरा प्रकल्प एकंदरितच या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आजाराचे आगार बनला आहे. या ठिकाणच्या परिस्थितीचा त्रास येथील नागरिकांना 12 महिने 24 तास त्रास होत आहे.
- प्रकल्प शहराबाहेर हलविण्याची गरज
प्रकल्पाच्या सुरुवातीला सन 2000 ते 2001 मध्ये या परिसरात नागरीवस्ती कमी होती. त्यामुळे महापालिकेने या परिसरातील सुमारे 12 एकर जागा कचऱ्यापासून खतनिर्मितीसाठी झूम कंपनीला दिली. काही महिन्यांतच झूम कंपनीने आपला गाशा गुंडाळला. सध्या प्रकल्पाभोवती नागरी वस्ती वाढली. आणि कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा तोकडी पडली. परिणामी प्रकल्प स्थळावर कचऱ्याचे डोंगर तयार झाले. यातून येणारी दुर्गंधी, माश्या, डासांचा प्रादुर्भावामुळे परिसरातील स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
लाईन बझार परिसरात प्रकल्पाला लागूनच आष्टेकरनगर, गायकवाड मळा, चौगुले मळा आणि देवार्डे मळा आहे. लाईन बझारमध्ये भरगच्च वस्ती आहे. सर्किट हाऊसमागे आणि भोसलेवाडीपर्यंत 11 मजली अपार्टमेंट, बंगले आहेत. या परिसरात या प्रकल्पाचा अनेक वाईट परिणाम होत आहेत. उन्हाळ्यात पेटलेल्या कचऱ्याची राख या परिसरातील घरात, टेरेसवर पसरते. पावसाळ्यात माशा आणि डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. आणि हिवाळ्यात संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरते. त्यामुळे उन्हाळ्यात धुराचे लोट घरात थांबू देत नाहीत. पावसाळ्यात दिवशा माशा आणि रात्री डास झोपू देत नाहीत तर हिवाळ्यात दुर्गंधी जेऊ देत नाही. अशा अवस्थेत या परिसरातील नागरिक जीवन जगत आहेत. त्यामुळे हा प्रकल्प शहराबाहेर महापालिकेला मिळालेल्या टोपच्या जागेत हलविण्याची मागणी होत आहे.
शहरातून दररोज 220 टन कचरा जमा.
सध्या प्रकल्प स्थळावर सुमारे आठ लाख टन कचऱ्याचा डोंगर.
उन्हाळ्यात लागणाऱ्या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरतात.
पावसाळ्यात माशा आणि डासांचे साम्राज्य.
हिवाळ्यात दुर्गंधी.
परिसरात नागरिकांना घसा, त्वचा, श्वसनाचे व डोळ्यांचे विकार.