सूर्यकुमार ‘क्रिकेटर ऑफ द ईयर’ने सन्मानित
सलग दुसऱ्या वर्षी आयसीसीचा सन्मान : अर्शदीप सिंग, सिराज, जडेजा यांचाही गौरव
वृत्तसंस्था /लंडन
टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ अमेरिकेत दाखल झाला असून संघाने सरावाला देखील सुरुवात केली आहे. गुरुवारी आयसीसीने काही विशेष पुरस्कार जाहीर केले असून यामध्ये भारतीय खेळाडूंचा वरचष्मा पहायला मिळाला. जागतिक टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला टी-20 आंतरराष्ट्रीय ‘क्रिकेटर ऑफ द ईयर’ चा पुरस्कार दिला आहे. सूर्याच्या नावे टी-20 क्रमवारीत 861 गुण आहेत. दीर्घकाळापासून तो टी-20 क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. याशिवाय, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला देखील टी-20 टीम ऑफ द ईयर कॅप देण्यात आली. आयसीसीने वर्षभरातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू व्यतिरिक्त सूर्यकुमार यादवला ‘टी-20 आयसीसी टीम ऑफ द इयर’ कॅप देखील मिळाली. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगलाही ‘टी-20 टीम ऑफ द इयर‘ची कॅप देत त्याचा सन्मान केला आहे. याशिवाय भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला ‘टेस्ट टीम ऑफ द ईयर’ कॅप देण्यात आली. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी जडेजाला ही कॅप दिली. आयसीसीच्या अष्टपैलू क्रमवारीत रवींद्र जडेजा 444 रेंटिगसह अव्व्ल स्थानी आहे. तसेच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, शुबमन गिल, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनाही ‘आयसीसी वनडे टीम ऑफ द ईयर’ची कॅप देण्यात आली.
आयसीसी टी 20 क्रमवारीत भारत अग्रस्थानी कायम
टीम इंडियाचे टी-20 क्रिकेटमध्ये वर्चस्व आहे. भारतीय संघ 264 च्या रेटिंगसह आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. यापर्वी देखील भारत पहिल्या स्थानावर होता. ऑस्ट्रेलियन संघ 257 गुणासह दुसऱ्या स्थानी असून इंग्लंड 254 गुणासह तिसऱ्या, वेस्ट इंडिज 252 गुणासह चौथ्या स्थानी आहेत. दरम्यान, टी-20 वर्ल्डकपची सुरुवात 1 जूनपासून सुरु होणार आहे. स्पर्धेतील पहिली मॅच अमेरिका आणि कॅनडा यांच्यात होणार आहे. यानंतर भारताची सलामीची लढत 5 जूनला आयर्लंडविरुद्ध होईल. टीम इंडियाने 2007 मध्ये पाकिस्तानला पराभूत करत आपला पहिलावहिला टी-20 वर्ल्डकप जिंकला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वातील भारताचा प्रवास सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा ठरला होता. भारताला 2007 नंतरच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पुन्हा विजेतेपद मिळवता आलेले नाही. 17 वर्षानंतर रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील भारतीय संघ इतिहास रचणार का, हे पाहावं लागणार आहे.