चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी केयुआयडीएफसीचा सर्व्हे सुरू
बेळगाव : शहराला 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी मनपाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. शहरातील 10 प्रभागांमध्ये ही योजना सुरू आहे. सदर योजना राबविण्यासाठी घरोघरी जावून कर्नाटक अर्बन इन्स्ट्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनचे कर्मचारी सर्व्हे करत आहेत. घरामध्ये किती व्यक्ती राहतात, त्यांना किती पाणी लागते, याचा लेखाजोखा घेतला जात आहे. प्रत्येक कुटुंबाची माहिती घेऊन संबंधित प्रभागाला किती पाणीपुरवठा करावा लागणार, याची माहिती घेतली जाणार आहे. 24 तास पाणीपुरवठ्यामध्ये पाण्याची बचत होणार आहे. तातडीने पाणीपुरवठा करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. संबंधित कर्मचारी लाईट बिल, पाणी बिल तपासत आहेत. 24 तास पाणीपुरवठा योजनेमध्ये 8 हजार लीटरसाठी 48 ते 58 रुपयांपर्यंत बिल येऊ शकते. जेवढे पाणी आपणाला हवे आहे तेवढेच पाणी वापरता येणार आहे. संबंधित कुटुंबाला किती पाणी लागणार, संपूर्ण प्रभागाला किती पाणी पुरवठा करावा लागणार? त्यावरून पाण्याचे पाईप घातले जाणार आहेत. शहरातील 48 प्रभागांमध्ये सर्व्हे करण्यात येत आहे. कुटुंबांची माहिती ऑनलाईनद्वारे अॅपवर पाठविली आहे. अपार्टमेंट, खुल्या जागा, हॉटेल्स, रेस्टॉरेंट, लॉज व इतर आस्थापनांची माहिती घेण्याबाबत संबंधित अॅपवर अपलोड केली जात आहे. शैलजा कारेकर, नागराज कुंभार, मंजुनाथ गुरव, अनुसया उमरजी यांनी शनिवारी गवळी गल्ली, गोंधळ गल्ली परिसरात सर्व्हे करत असताना ही माहिती दिली.