पहलगामवर याचिकेला ‘सर्वोच्च’ नकार
प्रसिद्धीसाठी ही याचिका असल्याची कठोर टिप्पणी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशाच्या डोंगराळ भागांमध्ये उन्हाळ्यात पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांना सुरक्षा देण्यात यावी, असा आदेश केंद्र सरकारला द्यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्या. सूर्यकांत आणि न्या. एन. कोटीश्वर सिंग यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळताना याचिकाकर्त्यांना चांगलेच फटकारले आहे.
अशा याचिका केवळ प्रसिद्धीसाठी सादर केल्या जातात, असे स्पष्ट करत, आपण अशा प्रकारची याचिका का सादर केली आणि आपला अंत:स्थ हेतू काय आहे, अशा प्रश्नांचा भडिमार खंडपीठाने याचिकाकर्त्यांचे वकील विशाल तिवारी यांच्यावर केला. जम्मू-काश्मीरमधील पर्यटकांवर अशा प्रकारे प्रथमच गोळीबार झाला आहे. अनेक पर्यटकांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना संरक्षण देण्याचा आदेश केंद्राला द्यावा, अशी मागणी करणारी ही याचिका सादर करण्यात आली आहे, असा युक्तीवाद विशाल तिवारी यांनी न्यायालयात केला.
कठोर ताशेरे
ही याचिका फेटाळताना आपल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांवर कठोर ताशेरे झाडले आहेत. अशा प्रकारच्या याचिका सातत्याने सादर केल्या जातात. या याचिकांमागचा खरा हेतू केवळ प्रसिद्धी मिळविणे हाच असतो. या याचिका जनहित याचिका असल्या तरी त्यांच्यातून कोणतेही जनहित साधण्याचा याचिकाकर्त्यांचा उद्देश असतो असे वाटत नाही. त्यामुळे याचिका फेटाळण्यात येत आहे, असे न्यायालयाने आपल्या निर्णयपत्रात सोमवारी स्पष्ट केले आहे.
फेटाळली दुसरी याचिका
पहलगाम हल्ल्यासंबंधी फेटाळली गेलेली ही गेल्या चार दिवसांमधील दुसरी याचिका आहे. पहलगाम हल्ल्याची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली करण्याचा आदेश देण्यात यावा, अशी मागणी करणारी एका याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. ती याचिका फेटाळतानाही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खडसावले होते. याचिकाकर्त्यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखावयास हवे. याचिकाकर्त्यांवरही देशाचे काही उत्तरदायित्व आहे, याची जाणीव त्यांनी ठेवावयास हवी. उठल्यासुटल्या न्यायालयाचा दरवाजा ठोठावणे योग्य नाही, अशी टिप्पणी करण्यात आली होती.