तलाठ्यांचा राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा
खानापूर तलाठ्यांनी केले काम बंद : तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलनास सुरुवात
खानापूर : राज्यातील तलाठ्यानी आपल्या काही मागण्यासाठी राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्याला पाठिंबा म्हणून खानापूर तालुक्यातील तलाठ्यानी गुरुवारी कामबंद आंदोलनात सहभागी होऊन तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. सायंकाळी 5 वाजता या धरणे आंदोलन कार्यक्रमास्थळी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी भेट देऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी तलाठी संघटनेच्यावतीने आपल्या मागण्यांचे निवेदन आमदार विठ्ठल हलगेकर यांना दिले. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी तलाठ्यांच्या समस्यांबाबत चर्चा करताना काही मागण्या योग्य असल्याचे सांगून तलाठ्यांना कार्यालय आणि कामाची विभागणी केली पाहिजे, तसेच जिल्ह्याअंतर्गत बदलीचीही मागणी योग्य असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच लॅपटॉप मागणी पूर्णत्वासाठी आमदार फंडातून 10 लाखाचा निधी मंजूर झाला असून या निधीतून सर्व तलाठ्यांना लॅपटॉप देण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर केले. आपल्या मागण्याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी तसेच संबंधित मंत्र्याशी चर्चा करतो असे आश्वासन यावेळी दिले. मात्र तलाठ्याने आंदोलन वाढवू नये, आंदोलनामुळे शेतकऱ्यांचे त्रास होणार आहेत. यासाठी तलाठ्यानी आपले आंदोलन स्थगित करुन आपल्या मागण्यांचा सरकारकडे पाठपुरावा करावा, असे ते म्हणाले. अध्यक्ष शंकर माळगी, सादीक जी. पी., आर. एस. बागवान, शशिकला कुंदगोळ, राघवेंद्र फडके, मंजू संगण्णावर, देवराज एच., या पदाधिकाऱ्यांनी तरुण भारतशी बोलताना म्हणाले, खानापूर तालुक्यातील 41 तलाठी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. शुक्रवारी बेळगाव येथे जिल्हास्तरीय धरणे आंदोलनात खानापूर तालुका तलाठी संघटना सहभागी होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.