वचन पूर्तता केलेल्या काँग्रेसला पाठिंबा द्या
आमदार राजू कागे यांचा कागवाड मतदारसंघात प्रचार
बेळगाव : काँग्रेस सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे. सत्तेवर आलेल्या आठ महिन्यांत पाच गॅरंटी योजना राबवून राज्यातील जनतेला मदत केली आहे. मात्र भाजपकडून गेल्या दहा वर्षांत केवळ खोटी आश्वासने देण्यात आली आहेत. यासाठी मतदारांनी काँग्रेस पक्षाला साथ देऊन योग्य निर्णय घ्यावा, असे आमदार राजू कागे यांनी सांगितले. अथणी तालुक्यातील कागवाड मतदार संघातील गुंडेवाडी, अनंतपूर या जिल्हा पंचायत मतदारसंघामध्ये चिकोडी लोकसभा काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांचा प्रचार करून आयोजित जाहीर सभेमध्ये ते बोलत होते. या भागातील पाणीपुरवठा योजना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळात राबविल्या आहेत. बसवेश्वर पाणी उपसा योजना लवकरच पूर्ण केली जाणार असून, कृष्णा नदीचे पाणी दिले जाणार आहे. यासाठी काँग्रेस पक्षाचे हात बळकट करावे. उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
भाजपकडून जातीचे राजकारण
देशामध्ये बदल घडविणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण, पिण्याचे पाणी, रुग्णालय, गरिबांना घरे निर्माण करून दिल्यानंतरच बदल होणार आहे. स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे उलटली तरी गरिबांना आसरा नाही. तरुणांना रोजगार नाही. सर्व जाती, धर्म एकच म्हणून मनोभाव निर्माण करणे आवश्यक आहे. मात्र भाजपकडून जातीचे राजकारण केले जात आहे, असा आरोप करून भाजपला धडा शिकविला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
संपूर्ण राज्यात विकासकामांचा बोलबाला
यावेळी माजी आमदार केशव मूर्ती म्हणाले, मंत्री सतीश जारकीहोळी केवळ जिल्ह्यासाठी मर्यादित नाहीत. संपूर्ण राज्यामध्ये त्यांच्या विकासकामांचा बोलबाला आहे. यामुळेच त्यांची राज्याच्या राजकारणात वेगळी छाप उमटली आहे. चिकोडी मतदारसंघातून त्यांची कन्या प्रियांका जारकीहोळी निवडणूक लढवत असून, त्यांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी केपीसीसी सदस्य दिग्विजय देसाई, अनंतपूर ब्लॉक अध्यक्ष ओमप्रकाश पाटील, कागवाड ब्लॉक अध्यक्ष विजय अक्कीवाटे, माजी जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे, सिद्राय तेली, महांतेश सालीमठ आदी उपस्थित होते.