रणकुंडये हायस्कूलला जयभारत फाउंडेशनचा आधार
इमारत-सायन्स लॅबसाठी वीस लाखाची मदत
वार्ताहर /किणये
ग्रामीण भागातील शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावला पाहिजे. ग्रामीण परिसरातील गावागावांमध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक व वैज्ञानिक पद्धतीने शिक्षण घेता यावे, या उद्देशाने जयभारत फाउंडेशन यांच्यावतीने रणकुंडये हायस्कूलला इमारत बांधकामासाठी तसेच सायन्स लॅबसाठी मदत करण्यात आली आहे. या कामकाजाचा शुभारंभ सोमवारी सकाळी हायस्कूलमध्ये करण्यात आला. शाळांची सुधारित इमारत तसेच शाळेमध्ये विविध वैज्ञानिक प्रयोग असणे सध्याच्या काळाची गरज बनली आहे. मात्र बहुतांशी ग्रामीण भाग या सुविधांपासून वंचित आहे. यासाठीच रणकुंडये तीर्थकुंडये व कवलापूर वाडा या गावातील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने जयभारत फाउंडेशनने हा पुढाकार घेतला आहे. इमारत बांधकामासाठी तसेच लॅबसाठी 20 लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. या कामकाजाचा व इमारतीच्या एका मजल्याचा कॉलमभरणी पूजनाचा कार्यक्रम सोमवारी झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जयभारत फाउंडेशनचे सी. एस. आर. मॅनेजर बी. के. पाटील, संचालक जयभारत फाउंडेशन समीर कणबर्गी, रोटरी क्लब ऑफ बेळगावचे माजी अध्यक्ष डी. बी. पाटील हे उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अनेक गुण आहेत. त्यांची बुद्धिमत्ताही चांगली आहे. मात्र त्यांना वैज्ञाानिक, प्रायोगिक शिक्षण देणे गरजेचे आहे. यासाठीच आम्ही जयभारत फाउंडेशनच्या माध्यमातून उपक्रम हाती घेतलेला आहे, असे बी. के. पाटील यांनी आपल्या भाषणातून सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे राजाभाऊ पाटील होते. प्रमुख वत्ते म्हणून प्रा. विक्रम पाटील होते. विष्णू पाटील, वसंत ताशिलदार, कल्लाप्पा पाटील, रमेश पाटील, ग्रा. पं. माजी उपाध्यक्ष भरमाणी पाटील, यल्लाप्पा सक्रोजी, तातोबा खामकर आदींच्या हस्ते कॉलम भरणी पूजन करण्यात आले. प्रास्ताविक जे. वाय. पाटील यांनी केले. मुख्याध्यापिका आर. एल. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. रणकुंडये गावातील या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हायस्कूलच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी जयभारत फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. त्याबद्दल जयभारत फाउंडेशनचे कौतुक डी. बी. पाटील यांनी आपल्या भाषणातून केले. यावेळी प्रा. एम. बी. निर्मळकर, पी. पी. बेळगावकर आदींचीही भाषणे झाली. कृष्णा बिर्जे आदींसह इमारत बांधकाम कमिटीचे सदस्य, पालक वर्ग, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी हायस्कूलमधील विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन आर. व्ही. शिंदे यांनी केले.