शहराला शुद्ध पाणीपुरवठा करा
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील सर्व प्रभागांना शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा करा. सध्या साथीच्या आजारांनी डोकेवर काढले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा हा शुद्ध करण्यावर भर द्या. महत्त्वाचे म्हणजे काही ठिकाणी पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्या तक्रारीही दूर कराव्यात, असे खासदार जगदीश शेट्टर यांनी एलअॅण्डटी तसेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
विश्वेश्वरय्यानगर येथील केयुआयडीएफसी कार्यालयात एलअॅण्डटी कंपनीच्या तसेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी ही सूचना केली आहे. शहरातील पाईप लाईन तसेच इतर कामाचा आढावाही त्यांनी घेतला आहे. काविळ यासारखे आजार वाढत चालले आहेत. हा आजार दुषित पाण्यामुळेच होतो. तेव्हा कोठेही गळती लागली तर तातडीने त्याची दुरुस्ती करा. कारण त्या पाईपमधून दुषित पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तेव्हा तातडीने गळती काढाव्यात, असे त्यांनी सांगितले.
शहरामध्ये कोणकोणत्या प्रभागाला 24 तास पाणीपुरवठा आहे. तसेच कोणत्या विभागाला पाणीपुरवठा कमी आहे, याचा आढावा या बैठकीत त्यांनी घेतला. कोणत्याही परिस्थितीत पाणी कमी पडता कामा नये, याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, मनपाच्या मुख्य अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनीही समस्यांची माहिती दिली. यावेळी त्या समस्या सोडविण्याच्या सूचना खासदार जगदीश शेट्टर यांनी केल्या. या बैठकीला मनपा तसेच एलअॅण्डटी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
शहरात औषध फवारणी करण्यावर भर द्या
सध्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. डेंग्यू, मलेरिया, काविळ, चिकनगुणिया यासारख्या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. तेव्हा शहरातील प्रत्येक प्रभागात वरचेवर औषध फवारणी करा. तसेच याबाबत जनजागृतीही करा, अशी सूचना खासदार जगदीश शेट्टर यांनी केली.