कापोलीत उन्हाळी भातपीक जोमात
ऊस पिकापेक्षा उन्हाळी भातपीक लागवड अधिक फायदेशीर : पाण्याची सोय असल्यास पीक घेणे सुलभ
वार्ताहर /गुंजी
कापोली भागामध्ये गेल्या चार वर्षापासून उन्हाळी भातपीक घेण्यात येत असून सध्या येथील भातपीक जोमात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या भागात येथील शेतकऱ्यांनी उन्हाळी भात पिकाची जवळजवळ वीस एकरामध्ये भात लावण केली असून, सध्या ते भातपीक परिपक्व होण्याच्या मार्गावर आहे. येथील शेतकरी शिवाजी देसाई, चंद्रकांत देसाई, श्रीपती देसाई, जयसिंग देसाई, शिवाजी देवळी, वसंत न्हावी, संजय न्हावी, शंकर देसाई, मुरारी देसाई, इब्राहिमपूरकर, कृष्णा निलजकर संदीप देसाई, शरद देसाई आदी शेतकऱ्यांनी इंद्रायणी, अस्मिता त्याचबरोबर महाराष्ट्रमधून काही संकरीत बीज वापरून ही भात लागवड केलेली आहे. येथील शेतकऱ्यांच्या मते उन्हाळी भातपीक लागवड ही ऊस पिकापेक्षा फायदेशीर असून केवळ अडीच महिन्याचे हे पीक आहे. उसासाठी बारा महिने देखरेख करावी लागते. त्याचबरोबर ऊसतोड मजूर आणि कारखान्यावर अवलंबून राहावे लागते. मात्र या उन्हाळी शेतीमुळे येथील शेतकऱ्यांना कोणावरही अवलंबून न राहता किफाईतशिरपणे पावसाळ्यापेक्षाही या पिकामध्ये अधिक उत्पन्न मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यापेक्षा शेतमजूर मिळणेही सुलभ होत असल्याने ही शेती करणे परवडत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनीही पाण्याचा स्त्राsत असल्यास भाताचे उन्हाळी पीक घेण्यास काहीच हरकत नसल्याचे येथील शेतकरी सांगतात. सध्या या भागातील पीक परिपक्वतेला आले असून यावर्षी एकदाही वळीव पाऊस न झाल्याने सध्या पाण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे सध्या एखादा पाऊस झाला तर या पिकासाठी तो पोषक ठरणार असून येथील शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.