सुहास शेट्टी अन् तणावग्रस्त किनारपट्टी
गेल्या पंधरवड्यातील कर्नाटकातील घटना लक्षात घेता दक्षिण कन्नडमधील तणाव वाढतो आहे. कर्नाटकात पोलीस व्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरली आहे. म्हणून हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्या होत आहेत. आणखी काही जणांना सोशल मीडियावरून ‘आता तुमचा नंबर आहे’ अशा धमक्या दिल्या जात आहेत. या घटना म्हणजे सरकारचे अपयश नाही का? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी उपस्थित केला आहे.
हिंदू संघटनेचा कार्यकर्ता सुहास शेट्टी (वय 32) याचा मंगळूरमध्ये बाजपेमध्ये खून झाला आहे. खुनाच्या या घटनेनंतर किनारपट्टीवरील भागात तणाव वाढला आहे. 28 जुलै 2022 रोजी सुरत्कलमध्ये फाजिल नामक युवकाचा खून झाला होता. या खून प्रकरणातील सुहास हा प्रमुख आरोपी होता. फाजिलच्या खुनाचा सूड घेण्यासाठीच सुहास शेट्टीचा खून करण्यात आला आहे. या घटनेच्या काही दिवस आधी क्रिकेट सामन्यादरम्यान पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या म्हणून केरळच्या एका युवकाचा जमावाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. भाजपने या प्रकरणाची एनआयए चौकशी करण्याची मागणी केली आहे. मंगळूर पोलिसांनी आठ जणांची धरपकड केली आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यात जातीय तणाव वाढतो आहे. या घटनेनंतर सत्ताधारी काँग्रेस व प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या वाढल्या आहेत. एनआयए चौकशीची गरज नाही. यासाठी कर्नाटक पोलीस समर्थ आहेत, अशी भूमिका गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी मांडली आहे.
एकीकडे देशाच्या सीमेवर युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय सेना दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानवर हल्ला चढवला आहे. अशा परिस्थितीत देशांतर्गत परिस्थिती शांत असली पाहिजे. गेल्या पंधरवड्यातील कर्नाटकातील घटना लक्षात घेता दक्षिण कन्नडमधील तणाव वाढतो आहे. कर्नाटकात पोलीस व्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरली आहे. म्हणून हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्या होत आहेत. आणखी काही जणांना सोशल मीडियावरून ‘आता तुमचा नंबर आहे’ अशा धमक्या दिल्या जात आहेत. या घटना म्हणजे सरकारचे अपयश नाही का? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तितक्याच ताकदीने त्यांच्यावर पलटवार केला आहे. भाजप नेते अशा घटना घडू देत याच्या प्रतीक्षेत असतात. माणसाच्या जीवाला किंमत नाही का? एखाद्या खुनानंतर राजकीय लाभासाठी त्या घटनेचा वापर केला जातो. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षावर टीका केली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सारा देश दहशतवादाविरुद्ध एकवटला आहे. अशा परिस्थितीत कर्नाटकातही त्याचे भान बाळगणे गरजेचे आहे.
मंगळूरसह अनेक जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी वाढली आहे. सुहास शेट्टीच्या खुनापूर्वी सोशल मीडियावर ‘आता याला संपवतो’च्या धर्तीवर मेसेज फिरवण्यात आले होते. आता सुहास शेट्टीच्या खुनानंतर हिंदू व मुस्लीम नेत्यांना धमक्या येत आहेत. विश्व हिंदू परिषदेचे शरण पंपवेल, बजरंग दलाचे भरत कुमदेल यांना ‘आता पुढचे टार्गेट तुम्हीच’ अशा धमक्या देण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर धमक्या देऊन हिंदू संघटनांच्या नेत्यांना संपवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत पोलिसांची जबाबदारी मोठी असते. फाजिल हत्येनंतर सरकारने त्याच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांची भरपाई दिली होती. त्यापैकी 5 लाख रुपये त्याच्या भावाने सुहास शेट्टीच्या खुनाची सुपारी देण्यासाठी वापरल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. एखाद्या व्यक्तीच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या गुजराणासाठी सरकार, राजकीय पक्ष किंवा एखाद्या संघटनेकडून थोडीशी रक्कम दिली जाते. या रकमेचा वापर जर खुनाचा सूड उगवण्यासाठी केला गेला तर सरकारी पैशाचा दुरुपयोग करण्याचाच हा प्रकार नव्हे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सुहास शेट्टी खून प्रकरणात पीएफआयचा हात असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला आहे. यासाठी परदेशातून 50 लाख रुपये पाठवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या आरोपांचीही चौकशी केली जात आहे. उत्तर कन्नडमध्ये यापूर्वी अशा घटना घडायच्या. आता दक्षिण कन्नडमध्ये अशा घटनांची संख्या वाढली आहे. सरकार कोणतेही असो किंवा सत्तेवर कोणत्याही पक्षाचे सरकार असो. पोलीस यंत्रणेने जर स्वतंत्रपणे अशा घटना थोपवण्यासाठी काम केले तरच समाजात शांतता नांदणार आहे. अशा घटनांच्यावेळीही पक्षीय राजकारणाचाच विचार झाला तर सामाजिक शांततेला सुरुंग लागणार आहे. सध्या दक्षिण कन्नडमधील किनारपट्टीवर असेच प्रकार सुरू झाले आहेत. पोलीस यंत्रणेने समाजघातकांच्या नांग्या वेळीच ठेचल्या नाहीत तर तणाव आणखी वाढण्याची भीती आहे. राजकीय दबाव झुगारून पोलीस यंत्रणेने समाजहितासाठी योग्य पावले उचलण्याची गरज आहे.
दुसरीकडे कर्नाटकात उष्मा मात्र दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यामुळे अनेक गावात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. एकही गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याची समस्या होऊ नये यासाठी खबरदारी घ्या, अशी सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. जर मान्सूनला विलंब झाला तर 6 हजार 319 खेड्यात पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी तयारी करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी निधीची कमतरता नाही. पंचायत राज विभागाला 60 कोटी रुपये यासाठीच देण्यात आले आहेत. सध्या 551 खेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई दिसून येत आहे. यापैकी 123 गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जर वेळेत पाऊस झाला नाही तर 6 हजार 319 गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. गरज भासल्यास पाणी घेण्यासाठी तीन हजार कूपनलिका निश्चित करण्यात आल्या आहेत. यापैकी केवळ 500 कूपनलिकांचा सध्या वापर केला जात आहे. पाणीसमस्या जर आणखी गंभीर झाली तर मोठ्या प्रमाणात यंत्रणा राबविण्याची तयारी सरकारने केली आहे. हिंदू कार्यकर्त्याची हत्या, गंभीर पाणीप्रश्न याबरोबरच गेल्या आठवडाभरात आणखी एका मुद्द्यावर ठळक चर्चा झाली आहे. प्रसिद्ध गायक सोनू निगम हे कर्नाटकात वादग्रस्त ठरले आहेत. कर्नाटका फिल्म चेंबरने त्यांना सहकार्य न करण्याची भूमिका घेताच त्यांनी कन्नडिगांची माफी मागितली आहे. कर्नाटकातील एका संगीत कार्यक्रमात चाहत्यांनी कन्नड गाण्यांची फर्माईश केल्यानंतर त्यांची तुलना पहलगाममधील दहशतवाद्यांशी केल्यामुळे सोनू निगम यांच्याविरुद्ध कर्नाटकात एफआयआर दाखल झाला आहे. फिल्म चेंबरने टोकाची भूमिका घेतल्यानंतर त्यांनी कन्नडिगांची माफी मागितली आहे.