साखर उद्योगात जीडीपी 3 टक्के वाढवण्याची क्षमता
कोल्हापूर :
भारतीय कृषी क्षेत्र सुमारे 42.3 टक्के लोकसंख्येला उपजीविका पुरवते आणि देशाच्या जीडीपीमध्ये त्याचा वाटा 18.2 टक्के इतका आहे. साखर उद्योगात जीडीपीमध्ये आपला वाटा सध्याच्या 1-1.15 टक्क्यांवरून 3 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची क्षमता आहे. असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भारतात इथेनॉल उत्पादन आणि वापराला गती देण्यासाठी, ग्राहकांना जैवइंधन सहज उपलब्ध व्हावे, यासाठी साखर कारखान्यांना लवकरच इथेनॉल पंप उभारण्याची परवानगी दिली जाईल, अशी घोषणा मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केली.
नवी दिल्ली येथे ‘चिनीमंडी‘तर्फे आयोजित शुगर-इथेनॉल आणि बायोएनर्जी इंडिया कॉन्फरन्स आणि शुगर-इथेनॉल आणि बायोएनर्जी आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मंत्री गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, ‘चीनीमंडी‘चे उप्पल शाह, जे.के.ग्रुपचे संस्थापक जितुभाई शाह, सहसंस्थापक हेमंत शाह, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह साखर उद्योगातील तज्ञ, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री गडकरी यांनी जैवइंधन अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी धोरणात्मक निर्णय, तांत्रिक नवोपक्रम आणि उदयोन्मुख बाजारपेठेतील गतिशीलतेद्वारे ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वतता यामध्ये साखर उद्योगाची भूमिका अधोरेखित केली. ते म्हणाले कि, इथेनॉलचा वापर वाढवण्याच्या सरकारच्या व्यापक प्रयत्नांचा हा एक भाग असेल. सरकारने इथेनॉल मिश्रणाला गती दिली आहे. 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य 2030 पर्यंत नेण्याऐवजी ते 2025-26 पर्यंत आणण्यात आले आहे. त्यामुळेच डिसेंबर 2024 पर्यंत इथेनॉल मिश्रण 19 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यांनी उत्पादन आणि नफा वाढवण्यासाठी ऊस लागवडीचे आधुनिकीकरण करण्याच्या गरजेवरही भर दिला. शेतीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी ड्रोन आणि नॅनो खतांचा वापर वाढवावा, असे आवाहन केले.