‘भारतातही अशी स्थिती होऊ शकते’
काँग्रेस नेते सलमान खुर्शिद यांचे वादग्रस्त विधान, भारतीय जनता पक्षाचा हल्लाबोल
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बांगला देशात ज्याप्रमाणे तेथील सरकारच्या विरोधात हिंसक आंदोलने झाली, तरी स्थिती भारतातही निर्माण होऊ शकते,’ असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते सलमान खुर्शिद यांनी केले आहे. त्यामुळे गदारोळ उठला असून भारतीय जनता पक्षाने खुर्शिद यांच्यावर लोकांना भडकविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसला भारतात हिंसाचार भडकवायचा आहे. म्हणून लोकाना चिथावणी देण्यासाठी अशी भाषा केली जात आहे. हा भारताच्या लोकशाहीचा अपमान असून काँग्रेस नेत्याची भाषा घटनेच्याही विरोधात आहे, अशी टिप्पणी पूनावाला यांनी पत्रकरांशी बोलताना बुधवारी केली.
केवळ पंतप्रधान मोदी यांचा द्वेष
अशी हिंसेला चिथावणी देणारी विधाने काँग्रेस नेत्यांकडून वारंवार केली जात आहे. या विधानांमागे केवळ काँग्रेसच्या मनात असणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंबंधीचा द्वेष कारणीभूत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वेष करण्याच्या नादात ते भारताचाही द्वेष करु लागले आहेत. बांगला देशात तेथील बहुसंख्य मुस्लीम समाजाने हिंसाचाराला आधार घेत सरकारविरोधात आंदोलने केली. भारतात असे येथील हिंदू समाजाने करावे, असे विरोधकांना वाटते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सलमान खुर्शिद यांच्या नातेवाईकाने लोकसभा निवडणूक काळात एकदा ‘मत जिहाद’ ची भाषा केली होती. आता प्रत्यक्ष हिंसाचार व्हावा, असे काँग्रेसला वाटत आहे का, असेही टोकदार प्रश्न त्यांनी विचारले आहेत.
बांगला देशची पार्श्वभूमी
बांगला देशमध्ये गेले दोन महिने तेथील सरकारविरोधात हिंसक आंदोलने झाली. अखेर त्या देशाच्या नेत्या शेख हसीना यांना पदत्याग करुन पलायन करावे लागले आहे. या घटनेची पार्श्वभूमी सलमान खुर्शिद यांच्या विधानाला आहे. भारतातही असेच घडावे अशी काँग्रेसची इच्छा आहे आणि तीच सलमान खुर्शिद यांच्या मुखातून बाहेर पडली आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे.