अभ्यास आणि तपश्चर्या
अध्याय नववा
बाप्पांनी वरेण्याला सांगितलं की, मन आणि बुद्धी माझ्याचरणी अर्पण कर म्हणजे तू मला येऊन मिळशील जर हे करायला समर्थ नसशील तर अभ्यास आणि योगाचा आश्रय घे म्हणजे तू मला येऊन मिळशील. ह्या अर्थाचा असमर्थोऽ र्पितुं स्वान्तं एवं मयि नराधिप । अभ्यासेन चे योगेन ततो गन्तुं यतस्व माम् ।। 11 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. भक्तानं स्वत:ला ईश्वरार्पण करायचं उद्दिष्ट ठेवलं की, तो मन आणि बुद्धी ईश्वरार्पण करायचा प्रयत्न करू लागतो पण हे सहजी शक्य होत नाही. कारण त्यासाठी माणसाची बुद्धी आणि श्रद्धा दोन्हीही सात्विक असाव्या लागतात. पण सगळ्यांचीच बुद्धी आणि श्रद्धा सात्विक असतीलच असं नाही मग त्यांना भगवंत प्राप्ती कशी होणार? यावर उपाय म्हणजे बुद्धी आणि श्रद्धा सात्विक होण्यासाठी प्रथम बुद्धी आणि श्रद्धा उपजत जशा मिळाल्या आहेत तशा त्या स्वीकारून जर भक्ती करायला सुरुवात केली तर हळूहळू त्या दोन्हीचे शुद्ध म्हणजे सात्विकतेत रूपांतर होते. बाराव्या भक्तियोगाच्या अध्यायात भगवंतांनी याचे होकारार्थी उत्तर दिले असून यासंबंधी मार्गदर्शन केले आहे ते याप्रमाणे, भगवंत भक्ताला सांगतायत की, त्यांची भक्ती करत असताना, त्याचे आत्मतत्व आपोआप जागृत होईल. माझ्या मार्गदर्शनानुसार बुद्धीचा उपयोग करून घेऊन, मन माझ्या स्वरूपात गुंतव. तुझे मन आणि बुद्धी मोठ्या प्रेमाने माझ्या ठायी प्रविष्ट झाली की, तू माझ्यात येऊन मिसळलास म्हणून समज.
पुढे बाप्पा म्हणाले, काही वेळेला समोरचा सांगतो ते आपल्याला पटतं पण आचरणात आणायला जमतच असं नाही. मग असं कर, संबंध दिवसातील एक क्षणभर इतर सर्व विसरून माझं स्मरण कर. असं जो जो माझं स्मरण करत जाशील तो तो तुला विषयाचं विस्मरण होत जाईल. जसं पौर्णिमेचा पूर्ण चंद्र अमवास्येपर्यंत संपूर्ण लोप पावतो तसं तुझ्या मनातले विषय हळूहळू नाहिसे होतील. हे सर्व चित्त एकाग्र करून दिवसभरातील एक क्षण माझं स्मरण करणं अभ्यासानं साध्य होईल. कारण अभ्यासाने साध्य होणार नाही असे काहीच नाही. जर मन आणि बुद्धी ईश्वरार्पण करणं शक्य नसेल तर, बाप्पा पुढील श्लोकात अभ्यास आणि योग या माध्यमातून ईश्वरप्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न कर असे वरेण्याला सांगत आहेत.
असमर्थोऽ र्पितुं स्वान्तं एवं मयि नराधिप । अभ्यासेन चे योगेन ततो गन्तुं यतस्व माम् ।। 11 ।।
हे राजा, मला मन अर्पण करण्यास असमर्थ असशील तर अभ्यास आणि योग यांचे योगाने मजकडे येण्याचा प्रयत्न कर.
विवरण- बाप्पांच्या उपदेशानुसार मन आणि बुद्धी ईश्वरार्पण करावी असं जरी भक्ताला मनापासून वाटत असलं तरी मनाची वाऱ्यापेक्षा चंचल वृत्ती आणि बुद्धीची चौखूर धाव माणसाला आवरून धरणं अशक्य होतं. मन ईश्वराच्या ठिकाणी एकाग्र करावं म्हंटलं तर नाना प्रकारचे उलटसुलट विचार मनात येत असल्याने ईश्वराठायी एकाग्रता मुळात होत नाही आणि झालीच तर क्षणार्धात भंग पावते. अनेक संकल्पविकल्प करून बुद्धी निरनिराळ्या कल्पना लढवत राहते. त्यामुळे भक्ताच्या मनात असूनसुद्धा मन आणि बुद्धी ईश्वरार्पण करण्यास तो असमर्थ ठरतो. मनाला चुचकारून, समजावून सांगावे लागते की, ईश्वरचरणी विलीन होण्यातच तुझे भले आहे. सुरवातीला ते मुळीच ऐकणार नाही. कठोपनिषदात मनाला नाठाळ घोड्याची उपमा दिलेली आहे. त्याप्रमाणे नाठाळपणा करून ते चौफेर उधळेल पण ईश्वरचरणी विलीन होण्याचे नाव घेणार नाही. बाप्पांनी हे केव्हाच ओळखलं आहे आणि ईश्वराला सन्मुख झालेला भक्त निराशेने त्याला विन्मुख होऊ नये म्हणून ते त्याला सुचवतायत की, अभ्यास आणि योग हे पर्याय आजमावून तर पहा. वारंवार एखाद्या गोष्टीचा सराव करणे याला अभ्यास म्हणतात.
क्रमश: