For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जांबोटी-कणकुंबी भागात मान्सूनची जोरदार सलामी

10:43 AM Jun 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
जांबोटी कणकुंबी भागात मान्सूनची जोरदार सलामी
Advertisement

भातरोप तरु पेरणीला वेग

Advertisement

वार्ताहर /जांबोटी

जांबोटी-कणकुंबी भागात गेल्या दोन दिवसापासून मान्सूनला प्रारंभ झाला आहे. या परिसरात अधूनमधून मान्सूनच्या जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामातील शेती मशागतीच्या कामाला वेग आला आहे. सध्या या भागातील शेतकरीवर्ग भात रोपांच्या तरु पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे  मे महिन्यात झालेल्या मुसळधार वळीव पावसामुळे, या भागातील शेतकरी वर्गांना खरीप हंगामातील शेतवडीतील पेरणीपूर्व मशागतीची कामे करण्यास अनुकूल वातावरण मिळाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने भातरोप लागवड तसेच रताळी लागवड, भुईमूग पेरणीसाठी आवश्यक जमिनीची नांगरट करून ठेवली होती. अपेक्षेप्रमाणे या भागात गेल्या दोन दिवसापासून जून महिन्याच्या प्रारंभीच बुधवारपासून मान्सूनच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गांना भातरोपांच्या तरु पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने तरु पेरणीच्या कामाला प्रारंभ केल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.

Advertisement

 तरु पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी भातरोप लागवड

जांबोटी भागासह खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी वर्ग भात पेरणीऐवजी भातरोप लागवडच मोठ्या प्रमाणात करतात. साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या भागातील शेतकरी वर्ग रोप लागवडीसाठी आवश्यक भात तरुची पेरणी शेतवडीत करतात. त्यानंतर तरूची योग्यप्रकारे उगवण झाल्यानंतर भात तरूची वाढ होऊन पेरणीनंतर साधारणपणे वीस ते पंचवीस दिवसानंतर भात तरू लागवडी योग्य बनतात. रोप लागवडीसाठी धुवाधार पाऊस तसेच जमिनीत नैसर्गिकरित्या मुबलक पाण्याची आवश्यकता असते.  पावसाने योग्य साथ दिल्यास जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून रोप लागवडाला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. एकंदरीत मान्सूनला या भागात वेळेत प्रारंभ झाल्यामुळे  बळीराजा सुखावला आहे.

Advertisement
Tags :

.