निवडणूक आयोगासमोर शरद पवार गटाचा जोरदार युक्तिवाद
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
राष्ट्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हावर गुरुवारी महत्त्वाची सुनावणी झाली आहे. या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीने वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला आहे. मागील सुनावणीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून युक्तिवाद करण्यात आला होता. अजित पवार गटाने केलेले आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्या गटाने केला आहे. शरद पवार हे पक्षात हुकुमशाही राबवयाचे, स्वत:च्या मर्जीनुसार पदाधिकाऱ्यांची परस्पर नियुक्ती करायचे. तसेच त्यांचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद बेकायदेशीर होते असा युक्तिवाद मागील सुनावणीत अजित पवार यांच्या गटाने केला होता. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे वकील सिंघवी यांनी सलग दोन तास युक्तिवाद केला. त्यानंतर आयोगाने पुढील सुनावणी 20 नोव्हेंबर रोजी होईल अशी माहिती दिली.
सलग सुनावणी व्हावी अशी आमची मागणी होती, 20 तारखेनंतर सलग सुनावणी होणार आहे. काही तांत्रिक गोष्टी आम्ही आयोगासमोर आणल्या असून त्यावर सुनावणी होईल असे अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले आहे. निवडणूक आयोगासमोर आम्ही अनेक धक्कादायक आणि अजब गोष्टींमागचे तथ्य मांडले आहे. याचिकाकर्त्यांनी आयोगात जे दस्तऐवज सादर केले होत, त्यापैकी आम्ही 20 हजार अशी प्रतिज्ञापत्रे शोधून काढली आहेत, यातील 8900 प्रतिज्ञापत्रांचा चार्टच तयार करून दिला आहे. यातील अनेक प्रतिज्ञापक्षे खोटी आणि बनावट आहेत. मृत्यू झालेल्या लोकांच्या नावाने देखील प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलांचे देखील प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. पक्षात जी पदं कधीच नव्हती अशा पदांचा उल्लेख प्रतिज्ञापत्रांमध्ये करण्यात आला आहे. काही प्रतिज्ञापत्रांमध्ये गृहिणी असा उल्लेख असल्याचा दावा अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे. अजित पवार गटाकडे कुठलेच समर्थन नाही. याबाबतचा युक्तिवाद 20 नोव्हेंबरपासून सुरू होईल. खोट्या प्रतिज्ञापत्रांप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी आम्ही आयोगाकडे केली आहे. सत्याचा विजय होईल अशी आशा असल्याचे शरद पवार गटाचे वकील सिंघवी यांनी म्हटले आहे.