औषध कंपन्यांसाठी कठोर नियम
सरकारकडून सुधारित उत्पादन मानके विदेशातील मृत्यूंच्या घटनानंतर सतर्कता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने भारतीय औषध उत्पादक कंपन्यांसाठी औषध निर्मितीचे नवे मानके किंवा मापदंड जारी केले आहेत. या वर्षापासून फार्मास्युटिकल कंपन्यांना या मानकांवर आधारित औषधे तयार करावी लागणार आहेत. सरकारने सुधारित अधिसूचना जारी करून कंपन्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
2022 पासून परदेशात भारतीय औषधांमुळे झालेल्या मृत्यूंच्या घटनांनंतर केंद्र सरकारने औषध निर्मिती उद्योगाची प्रतिमा सुधारण्यासाठी औषध कारखान्यांवर कडक नजर ठेवली आहे. त्यानुसार भारतातील 8,500 लहान फार्मास्युटिकल कारखान्यांपैकी फक्त एक चतुर्थांश औषधे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) निर्धारित केलेल्या आंतरराष्ट्रीय औषध उत्पादन मानकांची पूर्तता करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नवीन अधिसूचनेमध्ये औषध उत्पादनासाठी कठोर मानके प्रस्तावित आहेत. मोठ्या कंपन्यांसाठी 6 महिने आणि छोट्या कंपन्यांसाठी 12 महिने वेळ देण्यात आला आहे. भारतीय फार्मास्युटिकल कंपन्यांना यावषी औषध निर्मितीच्या नवीन मानकांचे कठोर पालन करावे लागेल.