सामरिक सहकार्य हा भारत-अमेरिका संबंधांचा मुख्य आधार
टू प्लस टू’ चर्चेत अमेरिकेचे प्रतिपादन, राजनाथ सिंग यांच्याकडूनही भलावण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत आणि अमेरिका यांच्यातील ‘टू प्लस टू’ मंत्रीपातळीवरील संवादाला शुक्रवारी येथे प्रारंभ झाला आहे. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि अमेरिकेचे विदेश व्यवहार मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी या संवादाअंतर्गत दोन्ही देशांच्या संरक्षण सहकार्यासंबंधी चर्चा केली. हे सहकार्य हा दोन्ही देशांमधील संबंधांचा मुख्य आधार असल्याची प्रतिक्रिया ब्लिंकन यांनी व्यक्त केली. तर भारत-अमेरिका सहकार्य मुक्त आणि नियमबद्ध प्रशांत-भारतीय क्षेत्रासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन पहिल्या दिवसाच्या चर्चेनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केले आहे.
या चर्चेत भाग घेण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटोनी ब्लिंकन आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टीन हे भारताच्या दौऱ्यावर आलेले आहेत. तर भारताच्या वतीने परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि विदेश व्यवहार मंत्री लॉईड ऑस्टीन हे भाग घेत आहेत. या चारही मंत्र्यांच्या चर्चेला शुक्रवारी येथे प्रारंभ झाला असून ती दोन दिवस चालणार असल्याची माहिती देण्यात आली.
प्रशांत-भारतीय क्षेत्र महत्वाचे
प्रशांत भारतीय क्षेत्र हे जगाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आणि संवेदनशील आहे. तेथे शांतता आणि मुक्तता असणे आवश्यक आहे. तसेच या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय नियमांच्या आधारावर असलेली व्यवस्था असणेही आवश्यक आहे. याचसाठी आम्ही भारताच्या सहकार्याने प्रयत्नशील आहोत. आम्ही ‘क्वाड’ या संघटनेशीही सहकार्य याच पद्धतीने करीत आहोत, असे प्रतिपादन ब्लिंकन यांनी केले. भारताच्या दृष्टीनेही ही चर्चा महत्वाची ठरणार आहे.
माहितीचे आदानप्रदान
समुद्री क्षेत्रासंबंधी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. तसेच या क्षेत्रांच्या संरक्षणासाठी उपग्रहीय माहितीचे आदानप्रदान करण्यात येत आहे. प्रशांत-भारतीय क्षेत्राच्या संवर्धनासाठी आणि भरभराटीसाठी या क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या सर्व देशांना एकत्र करणे आणि त्यांना उपग्रहीय माहिती पुरविणे ही कार्ये केली जात आहेत. समुद्री क्षेत्रांमध्ये चालणारी बेकायदा मासेमारी, अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी, तसेच या क्षेत्रांवर एकाधिकार गाजविण्याचा प्रयत्न या सर्व कृत्यांच्या विरोधात आम्ही जागृती निर्माण करुन एक यंत्रणाही विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहोत, असेही चर्चेनंतर स्पष्ट करण्यात आले.
मुख्य भर भारत-प्रशांतीय क्षेत्रावर
शुक्रवारच्या चर्चेचा मुख्य भर भारत-प्रशांतीय क्षेत्रावरच होता. तसेच भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांवरही बोलणी करण्यात आली. जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचा दौरा केला होता. तो द्विपक्षीय संबंधांना नव्या उंचीवर नेऊन ठेवणारा ठरला. या दौऱ्यानंतर दोन्ही देश पूर्वी कधी नव्हते, इतके जवळ आले आहेत, अशी प्रतिक्रिया जयशंकर यांनी व्यक्त केली.
चर्चा ठरली सफल
भारत आणि अमेरिका यांच्यातील शुक्रवारची चर्चा सफल ठरली आणि ती मुक्त वातावरणात पार पडली. दोन्ही देशांनी एकमेकासंबंधीच्या अपेक्षा मोकळेपणाने मांडल्या. दोन्ही देशांसमोरची काही आव्हाने समानच असल्याने त्यांच्यातील सहकार्य हे परस्परपूरक आहे. तसेच ते एकांगी असून त्याला अनेक आयाम आहेत. नव्या जागतिक व्यवस्थेच्या काळात हे सहकार्य पथदर्शक ठरणार आहे. भविष्यकाळात दोन्ही देश एकमेकांच्या आणखी नजीक येतील. यामुळे वैश्विक व्यवस्थेला एक स्थैर्य प्राप्त होईल, असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला.
‘टू प्लस टू’ चर्चा फलद्रूप...
भारत आणि अमेरिकेतील चर्चा यशस्वी झाल्याचे जयशंकर यांचे प्रतिपादन
भारत-प्रशांतीय क्षेत्र मुक्त आणि नियमबद्ध ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार
भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य उत्तरोत्तर वर्धिष्णू होणार
संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक, तंत्रज्ञान आदान-प्रदान, माहिती हस्तांतरण होणार