उत्तर प्रदेश, बिहारमध्ये वादळी पावसाचे 18 बळी
दिल्ली-एनसीआरमध्ये पावसासह गारपीट
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या दोन दिवसात देशात वेगवेगळी हवामान परिस्थिती जाणवत आहे. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे 13 जणांचा मृत्यू झाला असून सुलतानपूरमध्ये सर्वाधिक सात जणांचा मृत्यू झाला. तसेच शेजारच्या बिहार राज्यातही पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून दोन्ही राज्यात मिळून 18 बळी गेल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पाटणामध्ये वादळामुळे भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. अनेक जिह्यांमध्ये झाडे उन्मळून पडली.
देशात अनेक हवामान प्रणाली एकाचवेळी सक्रिय झाल्या आहेत. वायव्य भारतावरील एक सक्रिय पश्चिमी विक्षोभ, उत्तर ते पूर्वेपर्यंत पसरलेली द्रोणीय स्थिती आणि बंगालच्या उपसागरातून येणारी आर्द्रता या सर्वांमुळे हवामान अस्थिर होत आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये तापमान 40 ते 46 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. तथापि, वादळी पाऊस आणि हलक्या पावसामुळे अनेक भागांमध्ये तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने कमी झाले. उत्तराखंडच्या मसुरीमध्ये गुरुवारी गारपिटीचा पाऊस झाला. तसेच गुरुवारी दुपारी दिल्लीतही गारपिटीचा पाऊस झाला. राजस्थानच्या अनेक जिह्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस सुरू होता. कोटा येथे एका घरावर वीज पडली.
उत्तर प्रदेशातील बांदा हे सलग तिसऱ्या दिवशी 45.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानासह सर्वात उष्ण ठिकाण राहिले. राजस्थान आणि मध्य प्रदेशातील बहुतेक जिह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. मध्य प्रदेशातील भोपाळ आणि सिधी येथे 43 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानासह सर्वाधिक उष्णता होती.
ईशान्येकडील राज्यांमध्येही पाऊस
पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्येकडील सर्व सात राज्यांमध्येही पाऊस झाला. मिझोराममध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक जिह्यांमध्ये शाळा दुस्रया दिवशीही बंद राहिल्या. खराब हवामानामुळे केदारनाथ धाम, फाटा, सोनप्रयाग, सारसी आणि गुप्तकाशी येथे हेलिकॉप्टर सेवा स्थगित करण्यात आली आहे. हवामान विभागाने बिहार, झारखंड, बंगाल, सिक्कीम, ओडिशा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मेघगर्जना, पाऊस आणि गारपिटीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.