‘त्या’ गाळ्यांचे कुलूप तोडून केला कब्जा
महात्मा फुले भाजी मार्केटचा वाद चिघळणार?
बेळगाव : महात्मा फुले भाजी मार्केटमधील गाळे महानगरपालिकेने जप्त केले होते. महसूल विभागाने ही कारवाई केल्यानंतर आता पुन्हा इनामदार कुटुंबीयांनी लॉक तोडून गाळे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता महानगरपालिका कोणते पाऊल उचलणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. भाजी मार्केटची इमारत महानगरपालिकेने उभी केली होती. मात्र, या जागेचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयामध्ये आहे. इनामदार कुटुंबीयांबरोबरच वक्फ बोर्डदेखील ही जागा आपलीच आहे, असे सांगून अनेकवेळा याठिकाणी वादाचे प्रसंग घडले आहेत.
शनिवारी महानगरपालिकेने अचानकपणे त्याठिकाणी जाऊन गाळे ताब्यात घेतले आहेत. यापूर्वीच महानगरपालिकेने ते गाळे लिलावाद्वारे काहीजणांना दिले होते. मात्र, बेकायदेशीररित्या काहीजण गाळ्यांवर कब्जा करून होते. यामुळे लिलावामध्ये गाळे घेतलेल्या व्यक्तींना नाहक भुर्दंड बसला होता. लिलावात घेतलेल्या सर्व व्यावसायिकांनी आम्हाला गाळे ताब्यात द्यावेत, अशी मागणी केली होती. त्यानुसार शनिवारी 6 गाळे व 2 गोडाऊन महानगरपालिकेने ताब्यात घेतली.
महानगरपालिकेने कारवाई केल्यानंतर सोमवारी इनामदार कुटुंबीय हे गाळे ताब्यात घेण्यासाठी दाखल झाले होते. गाळामालकांना आम्हालाच भाडे द्या म्हणून त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे तेथील व्यावसायिकांची चांगलीच कोंडी झाली आहे. महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आता कोणती कारवाई करणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अनेकवेळा अशाप्रकारे गाळे ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र, महानगरपालिकेचे कनिष्ठ कर्मचारी व काही अधिकारी वगळता वरिष्ठ अधिकारी मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता होत आहे.