अॅपच्या माध्यमातून सुरू असलेली दुचाकी, चारचाकी वाहतूक सेवा बंद करा
रिक्षाचालक संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
बेळगाव : सरकारच्या शक्तीयोजनेमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय आधीच ठप्प झाला असताना आता अनेक नवीन अॅपच्या माध्यमातून दुचाकी तसेच कॅब सेवा सुरु झाल्याने रिक्षा व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. शहरात 13 हजारहून अधिक रिक्षाचालक असून व्यवसाय नसल्यामुळे त्यांच्यावर रिक्षा विक्री करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नवीन अॅपच्या माध्यमातून सुरु असलेल्या दुचाकी व कॅबसेवा थांबवाव्यात, अशी मागणी उत्तर कर्नाटक ऑटोरिक्षा चालक संघाच्या वतीने मंगळवारी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली.
मागील काही दिवसांपासून बेळगाव शहरात ओला, उबेर, रॅपिडो यासह इतर अॅप्लिकेशनच्या दुचाकी, चार चाकी व रिक्षा सेवा सुरु आहे. कोणत्याही प्रकारची नोंदणी नसताना तेथील चालक शहरात व्यवसाय करीत आहेत. त्यांना कोणतीही ड्रेसकोडची सक्तीही नाही. तसेच महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कंपन्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे त्यांचा मनमानी कारभार सुरु आहे. असेच सुरु राहिले तर ऑटोचालकांना व्यवसाय करणे मुश्किल होईल.
बेळगाव शहरात सात ते आठ किलो मीटरला शहराची हद्द संपते. त्यामुळे लहान अंतरामध्येच सध्या 13 हजारहून अधिक ऑटोरिक्षा व्यवसाय करीत आहेत. त्यात आता रॅपिडोसारख्या अॅपच्या माध्यमातून दुचाकी सेवा दिली जात असल्याने व्यवसाय पूर्णपणे बंद होण्याची भीती रिक्षाचालकांनी व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी उत्तर कर्नाटक, ऑटोरिक्षा संघाचे अध्यक्ष शेखरप्पा मठपती, बेळगाव ऑटोरिक्षा चालक संघाचे अध्यक्ष मन्सूर होनगेकर, गौतम कांबळे, अब्दुलमेस्त्राr दुबईवाले, रफिक देवलापूर, अजिज मुल्ला यासह इतर उपस्थित होते.