जिल्हयात आरोग्य विभागाची 'स्टॉप डायरिया' मोहीम
रत्नागिरी :
जिल्ह्यात सध्या सुरू असलेला जोरदार पाऊस लक्षात घेता दूषित पाण्यामुळे अतिसाराचे (डायरिया) प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता, जिल्हा आरोग्य विभागाने विशेष खबरदारी घेतली आहे. नागरिकांचा अतिसारापासून बचाव करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. जिल्ह्यामध्ये बालमृत्यू दर कमी करण्याच्या उद्देशाने 'स्टॉप डायरिया' ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. १६ जून ते ३१ जुलै दरम्यान ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांमध्ये होणाऱ्या अतिसार आजाराविषयी जनजागृती केली जात आहे. जिल्हा आरोग्य विभागामार्फत या मोहिमेतंर्गत ओआरएस आणि झिंक गोळ्यांचे वितरण, स्वच्छतेबाबत सूचना तसेच घरोघरी संपर्क उपक्रम राबवण्यात येणार आहेत. आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांचा या उपक्रमात सक्रिय सहभाग राहणार आहे. त्याद्वारे बालमृत्यू दर घटविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्वाचा ठरणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात बालमृत्यू दर कमी करण्याच्या उद्देशाने 'स्टॉप डायरिया' मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. तुषार कुंभार आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेश्वरी सातव, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजीत यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी रत्नागिरीतील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोकण नगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बालमृत्यू दर घटविण्याच्या दृष्टीने दूषित पाण्यामुळे अतिसाराचे (डायरिया) प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेता, आरोग्य विभागाने नागरिकांना अतिसारापासून बचाव करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. अतिसार हा लहान मुलांसह मोठ्यांमध्येही गंभीर आजार ठरू शकतो. ज्यामुळे शरीरातील पाणी आणि क्षारांचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा येतो, वेळेवर उपचार न मिळाल्यास हा जीवघेणाही ठरू शकतो असे सांगण्यात येत आहे. अतिसाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन किंवा आरोग्य विभागाशी संपर्क साधून तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा असे आवाहन डॉ. आठल्ये यांनी केले आहे.
या मोहिमेच्या शुभारंभाप्रसंगी पीएचएन श्वेता तारये, प्रिया पेडणेकर, आरोग्य सहाय्यक चेतन शेटे, तुषार साळवी, श्रीम. पी. यु, भाटकर, श्रीम. ए. डी. शितोळे, यश फाऊंडेशनचे विद्यार्थी व प्रशिक्षक, सर्व आरोग्य कर्मचारी, आशा गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका, लाभार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- अतिसाराची लक्षणे व उपाय :
लक्षणे : वारंवार पातळ शौचास होणे त्याचबरोबर पोटात दुखणे, उलट्या होणे, ताप येणे व अशक्तपणा.
तातडीचा उपाय : शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ओआरएस (ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन) घ्यावे. ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पौष्टीक आहार : अतिसार बांबल्यानंतरही हलका आणि पौष्टीक आहार घ्यावा.
- अतिसार टाळण्यासाठी काय करावे?
▶ जेवण्यापूर्वी आणि शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
▶ उकळलेले किंवा फिल्टर्ड पाणी प्यावे.
▶ ताजे आणि गरम अन्न खावे व बाहेरचे उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे,
▶ फळे आणि भाज्या खाण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुवाव्यात.
▶ शौचालयाचाच वापर करावा व त्याची स्वच्छता राखावी.