राज्यात पर्यटकांची फसवणूक थांबवा
गृहमंत्र्यांनी कठोर कारवाई करावी- मायकल लोबो
म्हापसा : गोव्यात आपली फसवणूक झाली आहे अशी माहिती पर्यटकांनी आपल्यासोबत घेऊन जाणे राज्यातील पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत चुकीचे आहे. पर्यटकांची सुरक्षा तसेच त्यांचे हित महत्त्वाचे आहे. त्यामुळे गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी असे प्रकार गंभीरतेने घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार मायकल लोबो यांनी केली आहे. राज्यात येणाऱ्या पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रलोभने दाखवली जातात. आश्वासन दिल्याप्रमाणे पर्यटकांना सुविधा दिल्या जात नाहीत. उलट त्यांची मारहाण करून फसवणूक केली जाते. जे बेकायदेशीर दलाल आहेत अशांवर कारवाईसाठी वेगळ्या कायद्याची तरतूद हवी. काही दिवस त्यांना जामीन न देता कारागृहात ठेवले पाहिले. दंडाची रक्कम वाढवून 10 हजारांवरून 25 हजार झाली पाहिजे. असे फसवणुकीचे प्रकार घडल्यावर पोलीस तातडीने कारवाई करतात. पण आता असे प्रकार घडण्यापूर्वी त्यावर निर्बंध ठेवले पाहिजेत. ज्या ठिकाणी असे प्रकार घडतात त्या आस्थापनेचा परवाना पंचायतीने रद्द केला पाहिजे असेही लोबो म्हणाले. कारवाईसाठी काही कायदे आहेत तर असलेल्या काही कायद्यात दुऊस्तीची गरज आहे. ज्या कायद्यात दुऊस्तीची गरज आहे अशा कायद्यांचा लाभ उठवून बेकायदेशीर प्रकार करणारे सहज सुटून जातात. त्यामुळे डान्स बार चालविणाऱ्यांना सरकारकडून कडक संदेश गेला पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कायद्यात दुरुस्ती करून कठोर कारवाईचा दणका द्यावा असेही लोबो म्हणाले.