पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्या भारत न्याय यात्रेवर दगडफेक
राहुल गांधी यांच्या कारची काच फुटली
वृत्तसंस्था/ मालदा
पश्चिम बंगालच्या मालदामध्ये काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेवर दगडफेक झाली आहे. एका कारवर बुधवारी अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली आहे, राहुल गांधी यांच्या या कारच्या काच फुटली असल्याची माहिती काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिली आहे.
राहुल गांधी यांनी संबंधित कारची पाहणी केली आहे. हा हल्ला मालदाच्या हरिश्चंद्रपूर येथे झाला आहे. बिहारमधून पश्चिम बंगालमध्ये यात्रा पुन्हा पोहोचत असताना हा प्रकार घडला आहे. राहुल गांधी ज्या वाहनातून प्रवास करत होते, त्याच वाहनावर दगडफेक करण्यात आली आहे. हा प्रकार अस्वीकारार्ह असल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे.
तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने चौधरी यांचा आरोप फेटाळला आहे. तृणमूल काँग्रेसने चौधरी यांच्यावर बंगालची बदनामी करण्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांच्या ताफ्यावर बंगालमध्ये नव्हे तर बिहारमध्ये दगडफेक झाल्याचा दावा तृणमूल काँग्रेसच्या आयटी शाखेचे प्रमुख देवांगशु भट्टाचार्य यांनी केला आहे.