अन्नसाठा करा : पाकिस्तानचा आदेश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पहलगाम हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी भारत निश्चितपणे आपल्यावर हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानला घेरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्या देशाच्या प्रशासनाने आपल्या सीमावर्ती भागातील आणि पाकव्याप्त काश्मीर भागातील लोकांना दोन महिन्यांचा अन्नधान्य साठा करुन ठेवण्याचे आदेश दिले आहेत. भारत कोणत्याही क्षणी हल्ला करु शकतो, अशी पाकिस्तानची समजूत आहे.
भारताने पहलगाम हल्ला झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच जोरदार युद्धाभ्यासाला प्रारंभ केला आहे. भारताची तीन्ही सेनादले विविध प्रकारचा युद्धाभ्यास करीत आहेत. विशेषत: वायुदलाने सीमावर्ती भागात आपल्या विमानांना युद्धसज्ज ठेवण्याचा आदेश दिला असून भारताचे नौदलही पूर्णत: सज्ज असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचे दिसत असून प्रशासन आपल्या नागरीकांवर सूचनांचा भडिमार करीत आहे. भारताचा प्रथम हल्ला पाकव्याप्त काश्मीरवर होईल, अशी शक्यता पाकिस्तानने गृहित धरली आहे.
शस्त्रसंधीचा सातत्याने भंग
पहलगाम हल्ला झाल्यापासूनच पाकिस्तानने सातत्याने काश्मीरच्या सीमावर्ती भागात शस्त्रसंधीचा भंग चालविला आहे. पाकिस्ताने सैनिकांनी शुक्रवारी सलग आठव्या दिवशी सीमावर्ती भारतीय चौक्यांवर गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. मात्र, या माऱ्यात भारताची कोणतीही हानी झालेली नाही. भारतानेही पाकिस्तानच्या गोळीबाराला आक्रमक प्रत्युत्तर दिले असून पाकिस्तानच्या सैनिकांवर बंकर्समध्ये आश्रय घेण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानने सीमावर्ती भागात अधिक सैन्याची जमवाजमव केली आहे. तर पाकव्याप्त काश्मीरमधील एक हजारांहून अधिक मदरसे 10 दिवसांसाठी बंद केले आहेत. भारत या मदरशांना लक्ष्य बनविणार असल्याच्या भीतीपोटी हा निर्णय घेण्यात आला आहे. भारताने आपल्या सैन्यदलांना कोणत्याही कार्यवाहीची पूर्ण मुभा देण्याचा निर्णय घेतला आहे.