अजूनही ‘टी-20’ खेळण्याची क्षमता : विराट कोहली
केवळ ‘टी-20’च्या प्रचारासाठी वापरले जाणारे नाव बनून राहायचे नसल्याचे केले स्पष्ट
वृत्तसंस्था/ बेंगळूर
अमेरिकेत टी-20 विश्वचषक स्पर्धा होण्यास दोन महिने असताना विराट कोहलीने खेळाच्या प्रसारासाठी व जाहिरातबाजीसाठी नावाचा वापर होणारा मेंगास्टार बनून आपल्याला राहायचे नसल्याचे स्पष्ट केले आहे. माझ्या मते, माझ्यात अजूनही टी-20 खेळण्याची क्षमता आहे, असे कोहलीने म्हटले आहे. मुलाच्या जन्मामुळे दोन महिन्यांची विश्रांती घेतल्यानंतर परत आलेल्या कोहलीने सोमवारी रात्री पंजाब किंग्जविऊद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरसाठी 49 चेंडूंत 77 धावांची खेळी केली. सामनावीर पुरस्कारही त्यालाच देण्यात आला.
मला माहीत आहे की, माझे नाव आजकाल टी-20 क्रिकेटच्या बाबतीत जगाच्या अनेक भागांमध्ये केवळ खेळाचा प्रचार करण्याशी जोडलेले आहे. पण, माझ्यात अजूनही हा प्रकार खेळण्याची क्षमता आहे असे मला वाटते, असे सामन्यानंतर बोलताना 35 वर्षीय विराटने सांगितले. कोहलीच्या त्या उत्कृष्ट खेळीचे वैशिष्ट्या म्हणजे त्याने क्रीझमधून बाहेर सरून वेगवान गोलंदाजांच्या चेंडूंना एक्स्ट्रा कव्हरमधून सीमेच्या बाहेर रवाना केले. भारताच्या या माजी कर्णधाराने आता आणखी काही सिद्ध करून दाखविण्यासारखे राहिलेले नसले, तरी टी-20 प्रकारात सतत बदलत राहण्याची गरज त्याला माहीत आहे.
1 जूनपासून सुरू होणाऱ्या आणि अमेरिका व वेस्ट इंडिज यांच्याकडून संयुक्तपणे आयोजित केल्या जाणार असलेल्या विश्वचषकासाठी भारताच्या संघाची रचना कशी असेल याविषयीच्या अंदाजांना ऊत आलेला असताना विराट कोहलीची ही प्रतिक्रिया आली आहे. ऑफ-साइडला वेगवान गोलंदाजांचे चेंडू उचलून हाणल्याबद्दल विचारले असता तो म्हणाला की, आपल्या खेळात अशा पद्धतीने भर घालणे आवश्यक असते. सर्वांना माहीत आहे की, मी कव्हर ड्राईव्ह चांगला खेळतो. त्यामुळे प्रतिस्पर्धी मला तो फटका हाणण्याच्या दृष्टीने मोकळी जागा देणारच नाहीत. कागिसो रबाडा वा अर्शदीप सिंगसारखे गोलंदाज हे उंच आहेत. ते अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असतात. अशा वेळी चेंडूला थोडी गती मिळवून द्यावी लागते, असे कोहली पुढे म्हणाला.
कोहलीने इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका गमावली. कारण दुसऱ्या मुलाचा जन्म होणार असल्याने तो परदेशात होता. पण या दीर्घ विश्रांतीच्या काळात त्याला त्याच्या कुटुंबासोबत आवश्यक असलेला भरपूर वेळ घालवता आला. त्याशिवाय त्याला रस्त्यांवर ओळखले न जाता फिरता आले. या दोन्ही गोष्टींचा त्याला सर्वांत जास्त आनंद झालेला आहे.