Election 2025 : महाविकासची अग्निपरीक्षा, 'लाडक्या बहिणी'नंतर आता 'सिंदूर'चा इफेक्ट होणार?
या वातावरणाचा फायदा शिवसेना आणि भाजप यांनी पध्दतशीरपणे घेतला
By : संतोष पाटील
कोल्हापूर : नुकत्याच झालेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बाहीण योजना गेमचेंजर ठरली. पराभावाच्या धक्क्यातून महाविकास आघाडी सावरलेली नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले. पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने चढविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ हा प्रतिहल्ला प्रत्येक भारतीयामधील राष्ट्रवाद चेतवणारा आहे. लाडक्या बहिणींनी सत्तेची दिशा 360 अंशात फिरवली. आता ऑपरेशन सिंदूरच्या दणक्याने अगोदरच विस्कटलेली महाविकास आघाडी कसा तग धरते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
भारत-पाकिस्तान तणावाचे राजकारण
भारत-पाकिस्तान युद्धे (1947, 1965, 1971, 1999) आणि सततच्या तणावाने देशात राष्ट्रवादी भावना वाढवली आहे. विशेषत: 1971च्या युद्धाने बांगलादेश निर्माण केला, तर 1965च्या युद्धात भारताने लाहोरकडे आगेकूच केली होती. त्याचा तत्कालीन राजकीय लाभ काँग्रेसला झाला.
दरम्यान, मागील 30 वर्षात भारताच्या सीमेवरील कुरघोड्या आणि पाकिस्तान प्रणित अतिरेकी हल्ले हा कायमच राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू राहिले आहेत. महाराष्ट्रात या वातावरणाचा फायदा शिवसेना आणि भाजप यांनी पध्दतशीरपणे घेतला आहे.
मिनी विधानसभेचा प्रवास खडतर
2024च्या निवडणुकीत महायुतीने (भाजप, शिवसेना, एनसीपी) 235 जागा जिंकल्या. ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा होता. ही योजना महिलांना दरमहा दीड हजार रुपये देणारी होती. जी ग्रामीण आणि निम्न-मध्यमवर्गीय महिलांमध्ये लोकप्रिय ठरली.
लाडकी बहीण योजनेच्या जोडीला हिंदुत्व आणि राष्ट्रसुरक्षा या मुद्यांवरही महायुतीने आपली पकड मजबूत केली. ही पकड उत्तरोत्तर घट्ट होत असतानाचा ऑपरेशन सिंदूर हे सैनिक अभियान राज्याच्या राजकारणाची कूस कायम राखणारे ठरु पाहत आहे. प्रखर राष्ट्रवादाच्या झळा सोसत दुभंगलेल्या महाविकास आघाडीला मिनी विधानसभेचे मैदान गाजवावे लागणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
स्थानिक निवडणुका ऑक्टोबरमध्येच होतील. या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडीसाठी राजकीय दिशा ठरवणाऱ्या आहेत. येथे प्रथमच स्थानिक मुद्दे आणि उमेदवारांच्या प्रभावासोबत राष्ट्रीय राजकारणही निर्णायक ठरु शकते.
... तरच महाविकास आघाडी तग धरेल
महाविकास आघाडी (काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना-उबाठा) विधानसभेला पराभूत होण्यामागे अंतर्गत समन्वयाचा अभाव हे एक प्रमुख कारण होते. मात्र पराभावानंतर महाविकास आघाडी आणखीच सैरभैर झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रिकरणाबाबत अजित पवार आणि सुप्रिया सुळे निर्णय घेतील असे सांगत अजून राजकीय संभ्रम वाढवला.
उध्दव ठाकरे यांना मुंबई आणि ठाणे महापालिकेतील सत्तेत अधिक रस आहे. काँग्रेस लोकांच्या मनात अजूनही मोठ्या प्रमाणात असली तरी नेत्यांच्या मनात कितपत आहे हा मोठा प्रश्न आहे. दरबारी राजकारणातून काँग्रेसची घराणी अजूनही बाहेर पडलेली नाहीत.
युध्दाने भारावलेल्या राष्ट्रवादी वातावरणात महाविकास आघाडीची समावेशक धोरणे अपयशी ठरु शकतात. या पार्श्वभूमीवर एकजुटीच्या जोडीला लोकांना भावणारी धोरणे मांडावी लागतील. तर आणि तरच भाजपच्या तगड्या नियोजनापुढे महाविकास आघाडी तग धरेल.