राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के ; कोकणाची यंदाही बाजी
मुंबई । प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल आज शनिवारी २ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे. या निकालाची उत्सुकता राज्यातील सुमारे १४ लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांचे निकाल एकाच वेळी ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. राज्याच्या नऊ विभागीय मंडळांचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकतंच पत्रकार परिषद घेत इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. यंदा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के लागला आहे. राज्याचा एकूण निकाल जाहीर झाल्यानंतर बोर्डाकडून विभागीय निकालांचीही घोषणा करण्यात आली.दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने आपला दबदबा कायम राखत राज्याच्या निकालात प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर लातूर विभागाची कामगिरी सर्वात कमी पाहायला मिळत आहे.
निकालाची ठळक वैशिष्ट्ये :
एकूण निकाल:
राज्याचा एकूण निकाल ८९.७९% लागला आहे.
मुलींची बाजी: यंदाही मुलींनी मुलांच्या तुलनेत आघाडी घेतली असून मुलींचा निकाल ९३.१५%, तर मुलांचा निकाल ८६.८०% लागला आहे.
सर्वोत्तम विभाग: कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक (९४.१४%) लागला आहे
राज्यातील शैक्षणिक निकालांमध्ये कोकण विभागाचा एक वेगळाच दरारा पाहायला मिळतो. यंदाही कोकणच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत विभागाला अव्वल स्थानी नेऊन ठेवले आहे. कोकणातील निकालाची परंपरा पाहता, ग्रामीण भाग असूनही येथील विद्यार्थ्यांनी शहरवासीयांना मागे टाकले आहे.