सोनुर्लीतून सकाळी सुटणारी एसटी वेळेत सोडा
आगार व्यवस्थापक निलेश गावीत यांना निवेदन
न्हावेली / वार्ताहर
सोनुर्ली गावासाठी सावंतवाडी आगारातून सकाळी सव्वा नऊ वाजता सोडण्यात येणारी एसटी बस वेळेत सोडण्यात यावी,अशी मागणी सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर यांनी आगार व्यवस्थापक निलेश गावीत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.यावेळी भारतीय जनता पार्टीचे बांदा मंडळ अध्यक्ष सचिन बिर्जे उपस्थित होते.सावंतवाडी एसटी आगारातून सोनुर्ली गावासाठी सकाळच्या वेळी सव्वानऊ वाजता सोडण्यात येणारी एसटी बस गेले कित्येक महिने अनियमित सोडण्यात येत असल्याने शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे तसेच ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत या संदर्भात वेळोवेळी सावंतवाडी आगार व्यवस्थापक आणि एसटी प्रशासनाचे लक्ष वेधूनही काही सुधारणा होत नसल्याने आज पुन्हा एकदा उपसरपंच भरत गावकर यांनी बांदा मंडळ उपाध्यक्ष सचिन बिर्जे यांच्या समवेत आगार व्यवस्थापक श्री.गावित यांची भेट घेत निवेदन सादर केले.यांमध्ये वेळोवेळी मागणी करुनही सकाळी सव्वानऊ वाजता सावंतवाडी आगारातून सोडण्यात येणाऱ्या सोनुर्ली एसटी बसेसच्या वेळेत अनियमित दिसून येत आहेत.ही बस शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे. गेली कित्येक वर्षे ही बस याच वेळेत सावंतवाडी आगारातून सोडण्यात येत आहे.परंतु अलीकडे या बसेसच्या रुटमध्ये एसटी महामंडळाकडून काहीसा बदल करण्यात आल्याने ही बस अन्य गावांतून आल्यानंतर सोनुर्लीसाठी लावण्यात येते.त्यामुळे बऱ्याचदा अन्य गावातूनच सावंतवाडी डेपोत येण्यास या बसेसला विलंब होत असल्याने पुढे सोनुर्ली गावासाठी ही बस उशिराने सोडली जाते.परिणामी या सर्वांचा त्रास गावातील ग्रामस्थांसह शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो ही बस पूर्वीप्रमाणेच सोडण्यात यावी आणि ती नेहमीच्या वेळेत सोडण्यात यावी अन्यथा प्रशासनाच्या विरोधात सनदशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल असे निवेदनात म्हटले आहे.