शक्तिपीठला विरोध करून विरोधकांनी विकासाच्या आड येऊ नये
मी शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूने ; आ. दीपक केसरकरांचे प्रतिपादन
सावंतवाडी । प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक विकासकामाला विरोध केला जात आहे. हे विरोध करणारे माझे मित्र आहेत. पण , सिंधुदुर्ग जिल्ह्याने जंगले जपली आहेत . आमच्या पूर्वजांनी आणि आम्ही जंगले राखली ., म्हणून आमचा विकास थांबवायचा का ? शक्तीपीठ महामार्ग हा सिंधुदुर्ग आणि कोकणच्या विकासाला गती देणारा ठरणार आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूने मी ठाम आहे. हा शक्तिपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडायला हवा . जेणेकरून कोकणचा हापूस आंबा फळफळावर नागपूर दिल्लीपर्यंत पोहोचेल.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना आपण हे सुचित करणार आहे त्यामुळे विरोधकांनी उगाच या प्रकल्पाला विरोध करून आमच्या विकासाच्या आड येऊ नये असे शिवसेनेचे प्रवक्ते तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. ते सावंतवाडीत आले होते त्यानिमित्ताने त्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत विचारले असता ते बोलत होते.ते पुढे म्हणाले , माझ्या मतदारसंघातून शक्तिपीठ महामार्ग जात आहे . आम्ही आतापर्यंत या भागाच्या जनतेच्या विकासासाठी झटलो आहोत. त्यामुळे आता जनतेचा विकास कसा करायला हवा हे आम्हाला चांगलं माहित आहे. त्यामुळे विरोधकांनी उगाच या प्रकल्पाला विरोध करून आमच्या विकासाच्या आड येऊ नये हा माझा त्यांना सल्ला आहे असे ते म्हणाले ते पुढे म्हणाले. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करून सिंधुदुर्गचा विकास थांबवून ठेवू नका असं माझं स्पष्ट मत आहे. जैवविविधतेचे काय ते नुकसान होतंय यासाठी माझ्यासोबत चर्चेला बसा. हा रोड गेल्यामुळे समृद्धी येणार आहे. अन्यथा आमच्या लोकांनी भुकेने मरायचे का ? इथे उद्योग, विकास व्हायला नको का ? असा सवाल माजी मंत्री आ. दीपक केसरकर यांनी केला. आमच्या लोकांनी जंगले राखलीत. त्यावर अधिकारही त्यांचाच आहे. महामार्ग माझ्या मतदारसंघातून जातोय. माझा ठाम पाठिंबा त्याला आहे असही ते म्हणाले. नागपूरचा टायगर बघितल्यावर इथला ब्लॅक पँथर बघायला पर्यटक आले पाहिजे. इथला समुद्र बघायला लोक आले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मार्ग समृद्धी महामार्ग वाढवण बंदराला जोडला तसाच हा शक्तीपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडावा ही माझी मागणी आहे. येथून नागपूरची संत्री, आमचा माल परदेशात जाऊ शकतो असं मत आमदार केसरकरांनी व्यक्त केले.