अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीवर उपासमारीची वेळ
ना भरपाई, ना पेन्शन : वनखात्याकडून केवळ उपचार
वार्ताहर /कणकुंबी
तीन वर्षांपूर्वी अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिखले येथील शंकर गोविंद गावस (वय 70) याच्या आयुष्याची त्रेधातिरपीट होत असून वनखात्याकडून ना नुकसान भरपाई, ना वृद्धाप पेन्शन, ना अपंग पेन्शन व ना कोणता रोजगार त्यामुळे सत्तरी ओलांडलेल्या शंकर गावस यांना भविष्याच्या दृष्टीने वृद्धाप पेन्शन तरी मिळेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. चिखले गावानजीक शेतवडीतून घरी परतत असताना दि. 10 ऑगस्ट 2020 रोजी शंकर गावस याच्यावर अस्वलाने हल्ला चढवला होता. गावस यांचा संपूर्ण चेहरा अस्वलाने फाडून टाकला होता. अस्वलाने गावस याचे तोंड, डोळा व छातीचे लचके तोडले होते. अतिशय गंभीर अवस्थेत त्यांना केएलई इस्पितळात दाखल केले होते. दि. 10 ते 18 ऑगस्ट असे आठ दिवस उपचार करून त्यांना घरी पाठविले होते. दरम्यान हॉस्पिटलचे बिल तेवढे वनखात्याकडून देण्यात आले. तर औषध गोळ्dयांचा सर्व खर्च गावस यांनाच द्यावा लागला. पन्नास टक्के अपंगत्व आलेल्या गावस यांना ना अपंग पेन्शन, ना वृद्धाप पेन्शन व ना कोणता कामधंदा. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शंकर गावस यांच्यावर अस्वलाने केलेल्या हल्ल्याची धास्ती घेऊन काही दिवसांतच त्यांच्या पत्नीचेही निधन झाले. एकुलता अविवाहित मुलगा कामानिमित्त गोव्याला हॉटेलमध्ये आहे. तिन्ही मुली विवाहित असल्याने आज त्यांना कुणाचाही आधार नाही. वनखात्याने नुकसानभरपाई म्हणून काही रक्कम दिली असती तर गावस यांना थोडाफार आधार झाला असता. परंतु आजघडीला त्यांना कोणी कामावर घेत नाही आणि मोलमजुरीही मिळत नाही. वनखात्याकडून नुकसानभरपाई मिळणे गरजेचे होते. मात्र वनखात्याकडून कोणतीच आर्थिक मदत देण्यात येत नाही. यासाठी वनमंत्री, जिल्हा पालक मंत्री आणि आमदारांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.