एसटीला महिन्याला 300 कोटींचा लाभ
कोल्हापूर / दिपक जाधव :
महिलांना प्रवासात 50 टक्के सवलत आणि 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के सवलत दिल्याने एसटीच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सवलत योजनेमुळे ऑगस्ट 2022 पासून जून 2025 पर्यंत 63 कोटी 51 लाख ज्येष्ठ नागरिकांनी सुमारे तीन हजार 344 कोटी 57 लाख रुपयांचा प्रवास केला आहे. विविध सवलत योजनामुळे एसटीला दरमहा सुमारे 300 कोटी रुपयांचा लाभ होत आहे.
कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार, नादुरूस्त बसेसमुळे डबघाईला आलेली दळवळण यंत्रणा, आणि महामंडळाच राज्य सरकारमध्ये विलीनीकरण या मुद्यांवरून गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) सातत्यानं चर्चेत आहे. मध्यंतरी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा आणि अन्य सुविधांचा भार उचलण्याची हमी राज्य शासनानं दिली. मात्र, दरमहा सुमारे 100 पेक्षा अधिक कोटी रुपयांचा तोटा एसटी महामंडळाला सहन करावा लागत होता. यामध्ये राज्य शासनाकडून राज्यातील विविध वर्गांना दिल्या जाणाऱ्या सवलतींचा भार अधिक होता. त्यातच एसटीचं भारमानही कमी झालं होतं.
- राज्य सरकारने उचलला भार
राज्य सरकारच्या वतीनं एसटीतून प्रवास करणाऱ्या विविध वर्गातील 17 प्रकारच्या सवलती दिल्या जातात. यामध्ये आमदार, खासदार, पत्रकार यांना सवलती आहेत. याशिवाय राज्य सरकारनं घेतलेल्या नव्या निर्णयानुसार राज्यातील सर्व महिलांना महीला सन्मान योजने अंतर्गत 50 टक्के सवलत, साठ वर्षांवरील ज्येष्ठांना 50 टक्के सवलत तर 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के सवलत अमृत योजनेअंतर्गत देण्यात आलीय.
- ज्येष्ठांचा उदंड प्रवास
ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासावर यामुळं राज्य शासनाला ते एसटीला प्रतिपूर्ती म्हणून शंभर कोटी रुपये दरमहा द्यावे लागत आहेत. तर महिला आणि अन्य प्रवाशांना दिलेल्या सवलती पोटी सुमारे 150 ते 200 कोटी रुपये असं मिळून 300 कोटी रुपये राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला दिले जात आहेत. यामुळं कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर करता येण शक्य होतय.
- सरकारच्या निर्णयाचा फायदा
या संदर्भात बोलताना कोल्हापुरातील राज्य सरकारच्या अमृत प्रवास योजनेचा आम्हाला खूप फायदा झाला आहे. या योजनेमुळं आम्हाला देवदर्शनासाठी राज्यभरात कुठेही फिरता येतं. राज्यातील अष्टविनायक, पंढरपूर, तुळजापूर यासारख्या तीर्थक्षेत्रांना यापूर्वी कधी काही कारणामुळं भेटी देता आल्या नव्हत्या. ते आता सहज शक्य होत आहे. वयाची 75 ओलांडल्यामुळं आता घरातील अन्य सदस्यांवर भार होण्यापेक्षा देवदर्शन करणं अथवा नातेवाईकांकडं फिरायला जाणं हे जास्त सोयीस्कर ठरतंय. त्यामुळं आम्ही या योजनेचा फायदा घेत आहे. त्यामुळं आमचा प्रवास निश्चितच वाढला आहे.
-सर्जेराव पाटील.ज्येष्ठ नागरिक
-