बिहारला विशेष राज्याचा दर्जा शक्य नाही!
केंद्रीय मंत्री मांझी यांचे वक्तव्य : राजकीय वातावरण तापले
वृत्तसंस्था/ पाटणा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या एका वक्तव्यामुळे बिहारचे राजकीय वातावरण तापले आहे. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देणे शक्य नाही. आता कुठल्याही राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणे शक्य नसल्याचे नीति आयोगाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. केंद्र सरकार ईशान्येतील राज्यांमध्ये रस्त्यांचे जाळे निर्माण करत आहे. या भागांच्या समग्र विकासासाठी मोठ्या प्रमाणावर पावले उचलली जात आहेत. रालोआचे सरकार बिहारच्या विकासासाठी देखील आग्रही असून त्या दिशेने काम केले जात असल्याचे मांझी यांनी म्हटले आहे.
तर रालोआतील घटक पक्ष संजदकडून पुन्हा एकदा विशेष राज्याच्या दर्जाची मागणी करण्यात आली आहे. विशेष राज्याच्या दर्जाची मागणी आमच्या पक्षाकरता सर्वात महत्त्वाची आहे. आम्ही ही मागणी वारंवार उपस्थित करत आहोत. केंद्र सरकार यावेळी यावर विचार करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळाला तर राज्यात नवे उद्योग धोरण लागू होत जनतेला लाभ मिळणार आहे. तसेच बिहारमधील लोकांचे स्थलांतरही थांबणार असल्याचा दावा संजद नेते संजय झा यांनी केला आहे.
संजदच्या या मागणीचे समर्थन राज्यातील भाजप नेतेही करत आहेत. नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी देखील या मागणीकरता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आहे. विशेष राज्याचा दर्जा किंवा पॅकेज मिळाल्यास बिहारच्या स्थितीत सुधारणा होणार आहे. बिहारच्या विकासाला वेग देण्यासाठी विशेष राज्याचा दर्जा आवश्यक असल्याचा दावा या दोन्ही भाजप नेत्यांनी केला आहे.
राजदकडून नितीश कुमारांना सल्ला
भाजप अन् संजद बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळवून देण्याप्रकरणी अनेक वर्षांपासून केवळ नाटक आहेत. मागणी करणारे दोन्ही पक्ष केंद्रात सत्तेवर आहेत. केंद्र सरकार बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यास टाळाटाळ करत असेल तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्वरित पाठिंबा काढून घ्यावा असे राजद नेते भाई वीरेंद्र यांनी म्हटले आहे.