रामभक्तांच्या सेवेसाठी रेल्वेची विशेष तयारी
430 शहरांमधून 72 ट्रेन धावणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर अयोध्येत पोहोचणाऱ्या भाविकांना सोयीस्कर प्रवास देण्यासाठी भारतीय रेल्वेने विशेष तयारी केली आहे. अयोध्येसाठी रेल्वे अनेक नवीन गाड्या सुरू करणार आहे. यामध्ये एसी ते स्लीपर आणि जनरल अशा सर्व श्रेणीच्या गाड्यांचा समावेश असेल. येत्या काही दिवसांत रेल्वे अयोध्येकडे जाणाऱ्या नवीन गाड्यांचे वेळापत्रक जाहीर करू शकते. रेल्वे मंत्रालय सध्या राज्यांच्या मदतीने गाड्यांची संख्या आणि वेळापत्रकावर काम करत आहे.
सध्या अयोध्येसाठी 35 गाड्या धावत आहेत. त्यात दैनंदिन गाड्यांव्यतिरिक्त त्यात साप्ताहिक गाड्यांचाही समावेश आहे. परंतु 22 जानेवारीपासून सध्याच्या गाड्यांव्यतिरिक्त 37 जादा गाड्या चालवल्या जाणार आहेत. त्यानुसरा देशभरातील 430 शहरांमधून एकूण 72 गाड्या धावतील, अशी माहिती रेल्वेशी संबंधित सूत्रांनी दिली. राम मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना लक्षात घेऊन अयोध्येसाठी जादा गाड्या चालवल्या जाणार आहेत. अधिकाधिक शहरे थेट अयोध्येशी जोडण्याचा रेल्वेचा प्रयत्न असल्याचे रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
नव्या गाड्यांद्वारे रामनगरी अयोध्येला देशातील मोठ्या शहरांशी जोडण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे भाविकांचा प्रवास सुकर होणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार मागणी वाढल्यास गाड्यांची संख्या आणखी वाढवली जाणार आहे. भाविक व पर्यटकांची वाढ झपाट्याने झाल्यास अयोध्या स्थानकाचे नूतनीकरण केले जाऊ शकते. नवीन स्टेशनमध्ये दररोज 50 हजार लोकांना हाताळण्याची क्षमता असेल.