सरकारी इस्पितळांत विशेष पौष्टिक आहार
आरोग्य खात्याकडून योजना : रुग्णांना वैद्यकीय गरजेनुसार आहार पुरवठा : पहिल्या टप्प्यात बेंगळुरातील तीन ठिकाणी जारी
बेंगळूर : राज्यात प्रथमच सरकारी इस्पितळांमध्ये रुग्णांसाठी ‘विशेष पौष्टिक आहार योजना’ जारी करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सरकारी इस्पितळांमधील रुग्णांना विशेष पौष्टिक आहार उपलब्ध करून दिले जाणार आहे. गर्भवती महिला, बाळंतीणी, मुलांना रोगप्रतिकारक शक्ती आणि योग्य वाढीसाठी विशेष पोषक घटक मिळणे अत्यंत महत्वाचे आहे. या योजनेत अशा रुग्णांच्या गरजांना प्राधान्य देण्यात आले आहे. पुरेसा पौष्टिक आहार रुग्णांना लवकर बरे होण्यास साहाय्यकारी ठरणार आहे. राज्य सरकारने एका प्रसिद्धीपत्रकात याबाबतची माहिती दिली आहे. राज्यातील सरकारी जिल्हा आणि तालुका इस्पितळांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना, प्रामुख्याने मुले, गर्भवती महिला आणि बाळंतीणींना एकाच प्रकारचा सामान्य आहार दिला जातो.
रुग्णांच्या विशिष्ट पौष्टिक आहार विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी हे पुरेसे परिणामकारी ठरत नाही. रुग्णांची आरोग्य स्थिती आणि वयानुसार सर्वांना समान आहार देणे योग्य नाही. या समस्येचे निराकरण करण्यासाठी राज्य सरकारने सरकारी इस्पितळांमधील आहार पद्धती पूर्णपणे बदलली आहे. आता रुग्णांच्या वैद्यकीय गरजांनुसार आहार पद्धतीचे वर्गीकरण करण्यात आले आहे. इस्कॉनने आरोग्य खात्याच्या या योजनेसोबत भागीदारी केली आहे. यापूर्वी सरकारी इस्पितळांमध्ये दाखल होणारी मुले, गर्भवती महिला आणि बाळंतीणी यांना एकाच प्रकारचा आहार दिला जात होता. तथापि, आता ही पद्धत बदलण्यात आली असून आहाराचे पाच मुख्य श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. सामान्य आहार, उपचारात्मक आहार, गर्भवतींचा आहार, बाल आहार अशा पाच प्रकारात आहाराचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात बेंगळूरमधील तीन इस्पितळांत
सदर विशेष योजना म्हणजे सामान्य आहार नव्हे; तर रुग्णाचे आरोग्य सुधारण्यास मदत करण्यासाठी विशेषत: वैद्यकीय उद्देशांसाठी निवडलेली आहे. पहिल्या टप्प्यात ही योजना बेंगळूरमधील सी. व्ही. रामन जनरल हॉस्पिटल, जयनगर जनरल हॉस्पिटल आणि के. सी. जनरल हॉस्पिटलमध्ये सुरू केली जाईल. प्रत्येक रुग्णालयात दररोज 250 रुग्णांना आहार पुरवण्यासाठी इस्कॉनशी करार करण्यात आला आहे. याकरिता 9 महिन्यांच्या कालावधीसाठी आरोग्य खात्याकडून 1,37,45,700 रुपयांचा खर्च उचलला जाणार आहे. रुग्णांना दररोज नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण दिले जाईल. ही योजना प्राथमिक टप्प्यात यशस्वी ठरल्यानंतर राज्यभरात त्याचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
योजनेची मुख्य उद्दिष्टे ...
- विशिष्ट आरोग्यविषयक समस्यांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना आवश्यक पोषक घटक पुरविणे
- रुग्णांचे आरोग्य सुधारण्यास मदत करणारे पौष्टिक आहार पुरविणे
- वैज्ञानिकदृष्ट्या तयार केलेल्या आहार पद्धतीद्वारे उपचार अधिक प्रभावी करणे