चराठा शाळेत 'सायबर गुन्हे, मार्गदर्शन व खबरदारी' बाबत विशेष मार्गदर्शन
ओटवणे प्रतिनिधी : आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. तंत्रज्ञान जेवढे फायदेशीर आहे, तितकेच ते निष्काळजीपणा केल्यास धोकादायक ठरू शकते. त्यामुळे ऑनलाईन जगतात वावरताना 'स्मार्ट' असण्यासोबतच सतर्क आणि सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे असे आवाहन सावंतवाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे यांनी केले.
चराठा येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेत 'सायबर गुन्हे, मार्गदर्शन व खबरदारी' या विषयावरील विशेष मार्गदर्शन कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री हिंगे बोलत होते. यावेळी चराठा सरपंच प्रचिती कुबल, सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या महिला कॉन्स्टेबल आरती देसाई, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पेडणेकर व इतर शिक्षिका उपस्थित होत्या.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे यांनीऑनलाइन फसवणूक आणि सायबर धोके पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सध्या घडणाऱ्या विविध सायबर गुन्ह्यांची माहिती दिली. तसेच सायबर सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाचे महत्त्वाचे मंत्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सुरक्षिततेसाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले.
यावेळी महिला कॉन्स्टेबल आरती देसाई यांनी ऑनलाईन काम करताना काहीही संशयास्पद वाटल्यास किंवा कोणी ब्लॅकमेल करत असल्यास घाबरून न जाता तात्काळ आई- वडील किंवा शिक्षकांना सांगा असे आवाहन करून ऑनलाइन फसवणूक झाल्यास ‘राष्ट्रीय सायबर तक्रार निवारण पोर्टल’ वर तक्रार नोंदवा किंवा १९३० (1930) या सायबर हेल्पलाईन नंबरवर तात्काळ संपर्क साधा, असे आवाहन केले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पेडणेकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे आणि महिला कॉन्स्टेबल आरती देसाई यांचे आभार मानले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण झाली.