लवकरच 1,000 अमृत रेल्वे धावणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
येत्या काही वर्षांमध्ये रेल्वे विभाग 1 हजार अमृत भारत रेल्वेंचा प्रारंभ करणार आहे. भारताच्या सर्व राज्यांमध्ये या रेल्वेंचा संचार असेल, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत रेल्वेच्या भविष्यकालीन योजनांवर प्रकाश टाकला आहे.
मुंबई ते ठाणे अशा समुद्रावरुन जाणाऱ्या रेल्वे बोगद्याच्या प्रकल्पाविषयीही त्यांनी माहिती दिली. हा भारतातील अशा प्रकारचा प्रथम प्रकल्प साकारणार असून त्यामुळे मुंबई आणि ठाणे या दोन्ही शहरांमधील प्रवाशांचा मोठा लाभ होणार आहे. तसेच मुंबई ते ठाणे हे अंतर कमी होणार असून या प्रवासासाठी लागणारा वेळही मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.
प्रतीवर्ष 700 कोटी प्रवासी
भारतीय रेल्वे प्रतिवर्ष 700 कोटी प्रवाशांची वाहतूक करीत आहे. प्रत्येक दिवशीचे हे प्रमाण 2.5 कोटी इतके आहे. नागरीकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी अनेक नव्या सुविधा त्यांना देण्यात येत आहेत. रेल्वे वेळापत्रकाचे काटेकोर पालन, रेल्वे स्थानकांवर पिण्याचे स्वच्छ पाणी, प्रवाशांना चांगले अन्नपदार्थ, वाट पाहण्यासाठी प्रशस्त जागा आणि आसनांची व्यवस्था आदी सुविधा आता अनेक स्थानकांवर उपलब्ध झाल्या आहेत. रेल्वे जाळ्याचाही विस्तार करण्यात येत आहे, अशी विविध माहिती वैष्णव यांनी या मुलाखतीत विस्ताराने दिली आहे.