सोनिया गांधींनी तेलंगणातून निवडणूक लढवावी! मुख्यमंत्री रेवंत रेड्डींनी घेतली भेट
: राज्याचे लोक सोनियांना स्वत:ची आई मानत असल्याचे वक्तव्य
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना तेलंगणातून लोकसभा निवडणूक लढविण्याचे आवाहन केले आहे. तेलंगणाचे लोक सोनिया गांधींकडे मातेच्या स्वरुपात पाहतात, सोनिया गांधींनीच तेलंगणाला राज्याचा दर्जा मिळवून दिला होता असे वक्तव्य रेड्डी यांनी केले आहे. तर यासंबंधी योग्यवेळी निर्णय घेणार असल्याचे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. सोनिया गांधी या सध्या उत्तरप्रदेशातील रायबरेली मतदारसंघाच्या खासदार आहेत. परंतु या मतदारसंघातील बदललेली राजकीय समीकरणे पाहता सोनिया गांधी यावेळी नवा मतदारसंघ निवडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
रेवंत रेड्डी यांनी सोनिया गांधींची भेट घेत तेलंगणा काँग्रेसने एक प्रस्तावही संमत केल्याची माहिती दिली आहे. रेवंत रेड्डी हे राज्याचे उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमादित्य आणि राज्य महसूलमंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांच्यासोबत सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते.
या भेटीदरम्यान रेवंत रेड्डी यांनी विधानसभा निवडणुकीदम्यान देण्यात आलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसंबंधी सोनिया गांधी यांना माहिती दिली आहे. काँग्रेसने निवडणुकीदरम्यान 6 गॅरंटी जाहीर केल्या होत्या. यातील राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये महिलांसाठी मोफत प्रवास आणि गरीबांसाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य योजनेला लागू करण्यात आले आहे. याचबरोबर 500 रुपयांमध्ये सिलिंडर उपलब्ध करणे आणि 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची योजना लवकरच लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने जातनिहाय सर्वेक्षण करविण्याचा निर्णय घेतला असून याकरता तयारी पूर्ण झाल्याचे रेवंत रेड्डी यांनी सांगितले आहे.
काँग्रेस पक्ष तेलंगणात लोकसभेच्या अधिकाधिक जागा जिंकण्याचा (एकूण 17 पैकी) प्रयत्न करत आहे. लक्ष्य प्राप्त करण्यासाठी तयारी देखील सुरू असल्याचा दावा रेवंत रे•ाr यांनी सोनिया गांधी यांच्यासमोर केला आहे.
न्याययात्रेत राहुल यांची भेट
न्याय यात्रा झारखंडच्या रांची येथे पोहोचल्यावर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे राहुल गांधी यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. तेथे त्यांनी राहुल गांधींना निवडणुकीच्या काळात देण्यात आलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसंबंधी माहिती दिली होती. याचबरोबर त्यांनी सोनिया गांधींना तेलंगणातून निवडणूक लढविण्यास तयार करावे अशी विनंती राहुल गांधींकडे केली होती. लोकसभा निवडणुकीत राज्यात 15 हून अधिक जागा जिंकणार असल्याचे रेड्डी यांनी सांगितले होते. तेलंगणात लोकसभेचे 17 मतदारसंघ आहेत.