पिण्याच्या पाण्याची समस्या त्वरित सोडवा
कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं.ला मोर्चा काढून निवेदन
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
येथील मसणाई गल्लीतील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या त्वरित सोडवावी, तसेच बऱ्याच दिवसांपासून रेंगाळलेली जलजीवन योजना त्वरित सुरू करून आम्हाला व गावाला दररोज ताजे पाणी देण्याची व्यवस्था करावी, अशा आशयाचे निवेदन मसणाई गल्लीतील महिलांच्यावतीने घागरी मोर्चा काढून ग्रा. पं. ला देण्यात आले. यावेळी ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, बाबू दोडमनी, भारता पाटील, अर्चना पठाणेसह सुरेश राठोड यांच्याकडे निवेदन देण्यात आले. कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. ला तालुक्यामधून एक ‘ए’ ग्रेड ग्राम पंचायत म्हणून पाहिले जाते. सदर पंचायतीमध्ये एकूण 13 वॉर्ड असून सदस्य संख्या 34 आहे. एवढी मोठी विस्तार असलेल्या ग्रा. पं. कडे शासकीय अधिकाऱ्याबरोबर या भागाचे लोकप्रतिनिधींचेसुद्धा दुर्लक्ष झाले आहे. निवडणुकीवेळी मतांचा जोगवा मागणारे ग्रामपंचायत सदस्यांबरोबर या भागाचे लोकप्रतिनिधीसुद्धा कमजोर ठरल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. ने शासकीय निधीतून एकूण तीन विहिरींची खोदाई केली आहे. यापैकी दोन विहिरींना भरपूर पाणी आहे. तिसरी विहीर तळाला खडक लागल्यामुळे गावासाठी कुचकामी ठरली आहे. श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरसमोर व मार्कंडेय नदीकाठावर खोदाई केलेल्या विहिरींना भरपूर पाणीसाठा आहे. आता परत मार्कंडेय नदीकाठावरच आणखी एका विहिरीची खोदाई युद्धपातळीवर सुरू आहे. तेव्हा विहिरीला भरपूर पाणीसाठा असूनही नागरिकांना मात्र पाण्यासाठी 15-20 दिवसाने पाण्यासाठी ताटकळत रहावे लागत आहे, असे नागरिकांचे म्हणणे ऐकावयास मिळत आहे. निवेदनावेळी मंगल पाटील, अश्विनी पाटील, विमल पाटील, रुक्मिणी पुजारी, शालन पाटील, अर्चना बसरीकट्टी, जयश्री पाटीलसह मसणाई गल्लीतील असंख्य महिला उपस्थित होत्या.