शेतीला पाणीपुरवठ्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प फायदेशीर
आतापर्यंत 16,300 शेतकऱ्यांचे अर्ज दाखल : संपर्क साधण्याचे आवाहन
बेळगाव : विजेवरील भार कमी करून राज्यात ग्रीन एनर्जी निर्माण व्हावी, यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार पी. एम. कुसुम योजना शेतकऱ्यांसाठी राबवित आहे. यामध्ये शेतकऱ्यांना जलसिंचनासाठी सौरऊर्जा प्रकल्प अनुदानाद्वारे दिला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही विजेसाठी वीज वितरण कंपन्यांवर अवलंबून रहावे लागणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाअभियान’ योजना संपूर्ण देशभर राबविली आहे. कर्नाटक सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मागील काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. कृषी पंपांसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना सौरऊर्जा प्रकल्प घेण्यास सांगितले जात आहे. सध्या हेस्कॉमसह वीज वितरण कंपन्यांकडून शेतकऱ्यांना मोजकेच तास वीजपुरवठा केला जातो. हा वीजपुरवठा शेतकऱ्यांना अपुरा पडत असल्याने सौरऊर्जा हा पर्याय सर्वात परिणामकारक ठरू शकतो.
सौरऊर्जा प्रकल्पासाठी नोंदणी सुरू
कर्नाटक सरकारने या योजनेसाठी सौरमित्र या पोर्टलवरून नोंदणी सुरू केली आहे. आतापर्यंत 16,300 शेतकऱ्यांनी सौर प्रकल्पासाठी अर्ज दाखल केले आहेत. 3 एचपी सौर पंपासाठी 2 लाख 4 हजार 760 रुपये खर्च येतो. त्यापैकी 57 हजार 115 रुपये अनुदान केंद्र सरकारकडून देण्यात येते. 1 लाख 2 हजार 380 रुपये अनुदान राज्य सरकारकडून मिळते. उर्वरित 45 हजार 223 रुपये लाभार्थ्याला भरावे लागणार आहेत. तसेच काही सौर कंपन्या बँकांकडून कर्जाची सुविधा उपलब्ध करून देतात. त्यामुळे शेतकऱ्यांना सौरपंप बसविणे फायद्याचे ठरू लागले आहे. शेतकऱ्यांना केला जाणारा वीजपुरवठा हा जास्तीत जास्त पहाटेच्यावेळी असतो. पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याच्या घटनाही अधिक आहेत. सौर पंपामुळे शेतकऱ्यांना हव्या त्या वेळी पिकाला पाणी देता येणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या सौरमित्र या पोर्टलवर जाऊन नावनोंदणी करावी. तसेच अधिक माहितीसाठी 080-2220-2100 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.