Solapur MIDC मधील टॉवेल कारखाना आगीत खाक, मालकासह 8 जणांचा होरपळून मृत्यू
आग भडकत गेल्याने वरील एकालाही खाली येता आले नाही.
सोलापूर : अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी येथे असलेल्या सेंट्रल टेक्स्टाईल्स या टॉवेल कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत कारखान्याच्या मालकासह त्यांचे कुटुंब व कामगार अशा एकूण आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगितले जाते. आग 17 तासांहून अधिक काळ धूमसत होती. 100 हून अधिक गाड्या पाण्याचा फवारा मारण्यात आल्यानंतरही आग रात्री उशिरापर्यंत धुमसत होती.
उस्मान हासन मन्सुरी (वय 78), अनस हनीफ मन्सुरी (वय 26), शिफा अनस मन्सुरी (वय 24), युसूफ अनस मन्सुरी (वय 01, रा. अक्कलकोट रोड एमआयडीसी), मेहताब सय्यद बागवान (वय 55), आशाबानो मेहताब बागवान (वय 52), सलमान मेहताब बागवान (वय 24), हिना बागवान (वय 26, रा. गवळी वस्तीसमोर) अशी मृतांची नावे आहेत.
उस्मान मन्सुरी यांचा सेंट्रल टेक्स्टाईल्स टॉवेल कारखाना आहे. मालक उस्मान हे कारखान्याच्या वरच्या मजल्यावर राहत होते, तर काम करणारे बागवान कुटुंब हे तळमजल्यावर असलेल्या खोल्यांमध्ये राहत होते. रविवारी पहाटे 3.30च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सर्वजण झोपेत असल्याने ते कोणाच्याही लक्षात आले नाही.
कारखान्यामध्ये टॉ वेलचा मोठा स्टॉक तसेच केमिकलचा साठा असल्याने आगीने क्षणार्धात रौद्रऊप धारण केले. आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळताच प्रारंभी पाच गाड्या पोहचून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग पसरत गेली. आगीत खालच्या रूममध्ये झोपलेले कामगार मेहताब बागवान, सलमान बागवान व हिना बागवान यांचा होरपळून तसेच गुदमरून मृत्यू झाला.
यात मेहताब व आशाबोनो हे दोघे पती-पत्नी आहेत. तर सलमान, त्यांचा मुलगा तर हिना त्यांची मुलगी आहे. हे सर्वजण याच कारखान्यात काम करत होते. आशाबोने ही मन्सुरी यांच्या घरातील कामे करत होत्या. त्यानंतर आग पसरत गेली. वरच्या मजल्यावरील खोल्यामध्ये उस्मान मन्सुरी त्यांचा नातू अनस, नातसून शिफा तसेच अनस व शिफा यांचे एक वर्षाचे बाळ युसूफ व आशाबोनो बागवान असे पाचजण झोपले होते.
आग भडकत गेल्याने वरील एकालाही खाली येता आले नाही. त्यामुळे यात या पाचही जणांचा होरपळून मृत्यू झाला. आग आटोक्यात येत नसल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी कारखान्याची भिंत तसेच खिडकी फोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला. दुपारी चारच्या सुमारास यातील पाचजणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. आग रविवारी पहाटे 3.30 वाजता लागली होती.
तर रविवारी दुपारचे पाच वाजले तरी अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. या आगीत मन्सुरी यांच्या कुटुंबातील चार तर बागवान यांच्या कुटुंबातील चार अशा आठ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे अग्नितांडव पाहण्यासाठी कारखान्याच्या परिसरात दिवसभर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
100 हून अधिक वाहनांतून पाण्याचा मारा
कारखान्यात लागलेल्या आगीची माहिती मिळताच सोलापूर महापालिका अग्निशमन विभागाची दोन पाण्याची वाहने घटनास्थळी पोचली. मात्र आगीची भीषणता इतकी मोठी होती की पंढरपूर, अक्कलकोट, एनटीपीसी येथूनही अग्निशमन करणारी वाहने मागविण्यात आली. सुमारे 100 गाड्या पाण्याचा मारा केला तरीही रात्री उशिरापर्यंत आग नियंत्रणात आली नव्हती.
जीव वाचवण्यासाठी मन्सुरी कुटुंबाने घेतला होता बाथरूमचा आधार
आग रविवारी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास लागली होती. आग एवढी भीषण होती की आजूबाजूच्या भिंती तसेच स्लॅब देखील पडले. कारखान्यातील दाहीदिशांना आगीचा डोंब समोर दिसत असल्याने कारखान्यात अडकलेल्या मन्सूर कुटुंबाने शेवटी बाथरूमचा आधार घेतला. तेथूनच त्यांनी सकाळी सहापर्यंत मदतीसाठी फोनवरून नातेवाईकांना विनवणीही केली. मात्र, सहानंतर आग व धुरात गुदमरून मन्सूर कुटुंबातील सदस्यांचा यात अंत झाला.