For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लुपस रुग्णांबाबत समाजामध्ये गांभीर्य आवश्यक

10:01 AM May 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
लुपस रुग्णांबाबत समाजामध्ये गांभीर्य आवश्यक
Advertisement

भारतातील 25 हजार लोकांपैकी एकाला जडतो आजार : लुपसचे पुरुषांपेक्षा स्त्राrयांमध्ये 9 पटीने प्रमाण जास्त : वेळीच उपचार गरजेचा

Advertisement

बेळगाव : आज 10 मे ‘जागतिक लुपस डे’... आज जागतिक एसएलई म्हणजेच ‘सिस्टेमीक लुपस एरथामेटोसीस’बद्दल जनजागृती करण्याचा दिवस आहे. हा रोग स्वयंप्रतिकार रोग आहे. ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकार शक्ती चुकून निरोगी ऊतींवर हल्ला करते. यामध्ये कोणत्याही अवयवाचा समावेश असू शकतो. विशेषत: त्वचा, किडनी, सांधे, फुफ्फुस इत्यादी. लुपसबद्दल जागरुकता नसल्याने अनेक महिने निदान होण्यास विलंब होऊ शकतो. भारतातील 25 हजार लोकांपैकी एकाला हा आजार होतो. पुरुषांपेक्षा स्त्राrयांमध्ये याचे प्रमाण 9 पटीने जास्त दिसून येते. हे लहान मुलांमध्येदेखील पाहिले जावू शकते. सुमारे 20 टक्के रुग्ण हे 16 वर्षांपेक्षा कमी वयाचे असतात.

एसएलईची लक्षणे कोणती?

Advertisement

सतत ताप येणे, तोंडात व्रण येणे, अशक्तपणा, भूक न लागणे, वजन कमी होणे, केस गळणे, चेहऱ्यावर पुरळ येणे, चेहरा व पायांवर सूज येणे, हे सामान्यपणे दिसून येते. 90 टक्के रुग्णांना सांधेदुखीचा त्रास होतो.

एसएलई कसे ओळखायचे?

संधिवात तज्ञ म्हणजेच ऱ्हुमेटॉलॉजिस्ट प्राथमिक अवस्थेतच एसएलई ओळखण्यासाठी एएनए, डीएनए, सीआरपी, कॉम्प्लिमेंट्स यासह विविध चाचण्या करतात. मात्र एएनए चाचणी पॉझिटिव्ह आली तरी सर्व रुग्ण एसएलईचे नाहीत. निदानासाठी या चाचण्यांचा रुग्णांच्या लक्षणांशी वैद्यकीयदृष्ट्या सहसंबंध असणे आवश्यक आहे.

एसएलईवर उपचार आहे का?

होय. रोगाची तीव्रता, प्रभावित अवयव, रुग्णाचे वय आणि लिंग संबंधित गुंतागुंत यावर अवलंबून असते. प्रत्येक रुग्णासाठी उपचार वेगवेगळे असतात. आज अनेक नवीन व सुरक्षित औषधे उपलब्ध आहेत. जीवनशैलीतील बदल, सूर्यप्रकाशापासून संरक्षण, तणाव कमी करणे, ध्यान करणे, पुरेशी विश्रांती, व्यायाम, योग्य संतुलित आहार दीर्घकाळासाठी पूरक ठरतो. या रोगामध्ये चढ-उतार असू शकतात. परंतु तो आयुष्यभर राहतो. गुंतागुंत टाळण्यासाठी व योग्य उपचारासाठी ऱ्हुमेटॉलॉजिस्टना संपर्क करणे आवश्यक आहे.

हा सांसर्गिक आहे का?

नाही. पण तो आनुवंशिक असल्याने कुटुंबातील पाच ते बारा टक्के सदस्यांमध्ये तशी लक्षणे आढळू शकतात.

एसएलई प्राण घातक आहे का?

किडनीचा आजार किंवा किडनी फेल होणे मृत्यूचे सामान्य कारण आहे. एसएलईच्या जवळपास 30 ते 40 टक्के रुग्णांना लुपस नेफ्रायटीस होऊ शकतो. प्रचलित समजुतीच्या विरुद्ध किडनी हा रोगाच्या गुंतागुंतीचा भाग म्हणून प्रभावित होतो आणि वापरलेल्या औषधांमुळे नाही.

एसएलई रुग्णांमध्ये गर्भधारणा?

लुपसमध्ये गर्भपात होण्याची शक्यता अधिक असते. जेव्हा रोग नियंत्रित असतो तेव्हा गर्भधारणेचे नियोजन करणे आवश्यक आहे.गर्भधारणेदरम्यान संधिवात तज्ञ उपचारांत बदल करू शकतात. जेणेकरून गर्भावर प्रतिकुल परिणाम होणार नाहीत. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून उपचार थांबविणे धोकादायक आहे. गर्भधारणेच्या चांगल्या परिणामांसाठी प्रसूतीतज्ञ, तसेच संधिवात तज्ञ यांच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. लुपससह जगणे कठीण असले तरी समाजाने व कुटुंबीयांनी त्याचे गांभीर्य ओळखून रुग्णांना समजून घेणे आवश्यक आहे. या आजाराबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी आपण एकत्र येवून योग्य सपोर्ट सिस्टीम तयार करूया.

-डॉ. उत्कर्षा एस. पाटील,एमबीबीएस एमडी (मेडीसीन),पीडीएफ-ऱ्हुमेटॉलॉजी.

डॉ. बी. एम. पाटील हॉस्पिटल, काळी आमराई-सोशल क्लब रोड, बेळगाव.

फोन क्रमांक 0831-2420193-94-95

Advertisement
Tags :

.