Marriage Ceremony: लग्न कार्यात Social Media चा वाढता प्रभाव कसा हानीकारक ठरतोय?
अगदी विवाहसंस्था सुद्धा या बदलांपासून अलिप्त राहिलेली नाही.
By : अवधूत शिंदे
कोल्हापूर : बदलता काळ, बदलते तंत्रज्ञान आणि झपाट्याने बदलत चाललेली जीवनशैली यामुळे माणसांच्या इच्छापूर्तीची पद्धती आणि जगण्याच्या सवयी देखील झपाट्याने बदलत चालल्या आहेत. अगदी विवाहसंस्था सुद्धा या बदलांपासून अलिप्त राहिलेली नाही.
पारंपरिक पद्धतीने होत असलेली लग्नं, कुटुंबातील जिव्हाळ्याचं वातावरण, एकत्र येणाऱ्या नातेसंबंधांची उब या साऱ्यांवर आता आधुनिक तंत्रज्ञान, मोबाईल आणि सोशल मीडियाने मोठा प्रभाव टाकलेला आहे. लग्नकार्याचे निमंत्रण देण्यासह कार्यक्रमाची झगमटात किंवा साधेपणाची जाहीर वाच्यता केली जातेय. संवादातून नातेसंबंध दृढ करण्यासाठीच योग्य तितकाच वापर आवश्यक आहे. अन्यथा विवाहसंस्था मोडण्याचे सोशल मीडियातील वावर हेही एक प्रमुख कारण आहे.
पूर्वीची लग्नसंस्था एक सामाजिक बंधन
पूर्वी लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं नव्हे तर दोन घरांचं, दोन कुटुंबांचं, आणि कधी कधी दोन गावांचंही मिलन मानलं जायचं. लग्न ठरवताना आई-वडिलांच्या मर्जीचा विचार होत असे. वधू-वरांची मानसिकता, घरातील संस्कार, व्यवसाय, घराणं याला खूप महत्त्व दिलं जायचं. लग्नसराई म्हणजे सर्व नातलग, शेजारी-पाजारी, गावकरी यांचं एकत्र येणं, एकत्र जेवणं आणि आनंदात सामील होणं असं असायचं.
या काळात विवाह म्हणजे एक जबाबदारी होती. नवरा-बायकोमधील भांडणं, मतभेद हे घरच्यांच्या मार्गदर्शनाने मिटवले जात. संसार करायचा असतो, टिकवायचा असतो हा विचार बायका-मुलींमध्ये खोलवर रुजलेला होता. कौटुंबिक वडीलधाऱ्या मंडळींचं अनुभवावर आधारित मार्गदर्शन हे लग्न टिकवण्याचं महत्त्वाचं कारण असायचं.
आजचा काळ लग्न समारंभ आणि सोशल मीडियाचा युग
सध्याच्या मोबाईल युगात लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं नातं नसून एक इव्हेंट बनलं आहे. लग्न ठरण्यापासून ते हळदीच्या विधींपर्यंत प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर प्रसिद्ध केली जाते. फोटो शूट्स, प्री-वेडिंग, पोस्ट-वेडिंग, व्हिडिओज, सिनेमासदृश ट्रेलर्स हे लग्नाचा अविभाज्य भाग झाले आहेत.
एकेकाळी साधेपणात होणाऱ्या लग्न सोहळ्याचं आता ग्लॅमरस इव्हेंट मध्ये रूपांतर झालं आहे. यात वाईट काहीच नाही, परंतु यातून काही सामाजिक परिणाम नक्कीच उध्द्वस्त होत आहेत. विवाहाचा मूळ उद्देश एकत्र येणं, समजून घेणं, एकमेकांचा आदर करणं हे कुठंतरी हरवत चाललं आहे. साजशृंगार, प्रसिद्धी, आणि इतरांपेक्षा जास्त काहीतरी करण्याची चढाओढ हावी झाली आहे.
सोशल मीडियामुळे वाढणाऱ्या अपेक्षा
आजकाल सोशल मीडियावर सतत नवऱ्याने बायकोला दिलेल्या गिफ्टचे फोटो, महागड्या वस्तू, ट्रिप्सचे अपडेट्स, एकमेकांना लिहिलेल्या पोस्ट्स पाहायला मिळतात. याचा थेट परिणाम इतर जोडप्यांवर होतो. उदाहरणार्थ, एका मैत्रिणीचा नवरा तिला गाडी भेट देतो, आणि ती त्याचा स्टेटस लावते.
मग दुसरी मैत्रीण लगेच नवऱ्याकडे तक्रार करते, तिने बघ किती छान गिफ्ट मिळवलं, तू असं का करत नाहीस? ही तुलना आणि अपेक्षांचा वाढता दबाव नात्यांमध्ये ताण निर्माण करत आहे. प्रेम, संवाद, सहनशीलता यांना मागे टाकून एकतर्फी अपेक्षा वाढल्या आहेत. हे सगळं अनेकदा वैयक्तिक वादाला कारण ठरतं.
मोबाईल आणि नात्यांमधील दुरावा
मोबाईल हा एक अतिशय उपयुक्त साधन असला, तरी त्याचा गैरवापर अनेक समस्यांना जन्म देत आहे. पूर्वी नात्यात काही कुरबुरी झाल्या, तर सासरीच त्या सोडवल्या जात. पण आजच्या काळात काहीही झालं की लगेच फोन करून आई-वडिलांना सांगतात. यातून सासर आणि माहेरच्या घरात आपण अंतर पाडत आहोत याच भानही राहत नाही.
घरगुती वाद एका मर्यादेत ठेवण्याऐवजी, तो सोशल मीडियावर इमोशनल पोस्टस्च्या ऊपात झळकतो. काही वेळा नववधू आपल्या लग्नाचे खासगी फोटो, व्हिडिओ, किंवा गुप्त गोष्टीसुद्धा सोशल मीडियावर शेअर करतात. यातून गोपनीयता भंग होते, आणि नात्यांमधील विश्वास डळमळीत होतो.
सोशल मीडियाचा गैरफायदा
असाही एक ट्रेंड पाहायला मिळतो की, सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्यासाठी जोडप्यांनी नात्याचा प्रचार करताना दिसतात. त्यातून नात्याचं प्रदर्शन होतं, पण त्याचा पाया कमकुवत होत नाही ना याचाही विचार करण्याची गरज आहे.
इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅप स्टेटसवर काय पोस्ट करायचं यावरून देखील नवरा-बायकोत भांडणं होण्याचे एक कारण घडत आहे. एक पोस्ट आवडली नाही, की लगेच तू माझा अपमान केलास, तू मला महत्व देत नाहीस यातून दुरावा निर्माण होवू शकतो.
अनेकवेळा लग्नाचे व्हीडीओ एडिट कऊन अतिशय फिल्मी बनवले जातात, पण खऱ्या आयुष्यात तेच प्रेम, सहनशीलता टिकत नाही. अशा परिस्थितीत विवाहसंस्था केवळ एक सोशल शो बनून राहते, ज्यात खरी भावना हरवून जावू शकते, याचेही भान ठेवण्यची गरज आहे.