सामाजिक कार्यकर्ते उल्हास देसाई यांचे निधन
सावंतवाडी । प्रतिनिधी
डेगवे( आंबेखणवाडी) गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यात आयुष्य वेचलेले आणि डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सचिव तसेच सेल्स टॅक्स विभागातील निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री. उल्हास बाबाजी देसाई वय 70 यांचे रविवार दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३:४५ वाजता डोंबिवली येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबईतील कोकणवासीयांमध्ये शोककळा पसरली आहे.श्री. देसाई यांनी आपल्या तरुणपणापासून सामाजिक कार्याची धुरा सांभाळली. आंबेखणवाडी सारख्या दुर्गम भागात वीज, रस्ते, शैक्षणिक सुविधा यांसारख्या मूलभूत गरजांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पुढाकारातून वाडीमध्ये वीजपुरवठा सुरू झाला, सार्वजनिक इमारती उभारल्या गेल्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे गावात एकोपा वाढविण्यात आला.मुंबईत वास्तव्यास असतानाही त्यांनी आपल्या मूळ गावी असलेली नाळ कायम जपली. आंबेखणवाडी युवक मंडळाची स्थापना करून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना दिली. नंदादीप वाचनालयाच्या उभारणीत व प्रगतीत त्यांचा मोलाचा वाटा होता. हे वाचनालय ‘अ’ वर्गापर्यंत पोहोचविण्यात त्यांनी मोठे योगदान दिले.डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाच्या माध्यमातून त्यांनी समाजमंदिर उभारणी, नळपाणी योजना, रस्ते, मोबाईल टॉवर, तसेच विविध विकासकामांसाठी अथक प्रयत्न केले. गावातील विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन, सांस्कृतिक जतन आणि सामाजिक एकात्मता वाढविणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य होते.त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना विविध सामाजिक संस्थांकडून “ग्रंथ मित्र पुरस्कार”, “समाज गौरव पुरस्कार”, “समाज प्रबोधन पुरस्कार” तसेच “स्मार्ट लीडर पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे सून असा परिवार आहे.