स्मार्ट वीज मीटर ही काळाची गरज
मुख्य वीज अभियंता स्टीफन फर्नांडिस यांचे मत : बिलिंगमधील चुका होणार कमी
पणजी : वीज वितरण प्रणालीच्या आधुनिकीकरणासाठी स्मार्ट मीटर बसविणे ही काळाची गरज असून ही पद्धती तेवढीच पारदर्शक आणि किफायतशीर आहे, असे मत मुख्य वीज अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी व्यक्त केले आहे.संयुक्त वीज नियामक आयोगाने काल गुऊवारी पणजीत आयोजित केलेल्या जनसुनावणीत ते बोलत होते. त्यावेळी आयोगाचे आलोक टंडन आणि ज्योती प्रसाद आदी मान्यवर उपस्थित होते. सध्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या विषयावरून राज्यात विविध वादांना तोंड फुटले आहे. त्यात काही राजकीय विरोधकही लोकांची मने कलुषित करून हा विषय संवेदनशील बनवित आहेत. त्यामुळे तांत्रिक तथ्यांपेक्षा राजकीय हेतूने विरोधच जास्त प्रमाणात होऊ लागला आहे, असे फर्नांडीस यांनी पुढे सांगितले.
बिलिंगमधील चुका होणार कमी
गोव्यात पूर्वीपासूनच इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक मीटरच्या माध्यमातून बिले देण्यात येत आहेत. त्यामुळे आता स्मार्ट मीटर वापरल्याने त्यात कोणताही फरक पडणार नाही. उलटपक्षी कार्यक्षमता सुधारून पारदर्शकताही वाढणार आहे. त्याचबरोबर ग्राहक आणि खात्यालाही वीज वापराचे नमुने अधिक स्पष्टपणे समजतील, ग्राहकांना वीज वापरावर नियंत्रण ठेवणे सुलभ होईल. तसेच बिलिंगमधील चुका कमी होतील, असे फर्नांडिस यांनी सांगितले. राज्यात आतापर्यंत 1020 फीडर आणि 5800 सरकारी संस्थांच्या इमारतींमध्ये स्मार्ट मीटर जोडणी पूर्ण झाली आहे. 9 हजार ट्रान्सफॉर्मर केंद्रांना जोडणी देण्याचे काम सुरू आहे. ऑगस्ट 2027 पर्यंत सर्व ग्राहकांना स्मार्ट मीटरची जोडणी देण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.
वीज दरवाढीचा बोजा नाही
पुढे बोलताना, फर्नांडिस यांनी, 2024-25 मध्ये वीज खात्याची महसुली तूट 181 कोटी ऊपये राहिली असली तरी या तुटीचा भार राज्य सरकार उचलणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ग्राहकांवर वीज दरवाढीचा कोणताही नवीन बोजा टाकला जाणार नाही, असेही ते म्हणाले.