स्मार्ट सिटी : ‘31 मे’ चे लक्ष्य गाठण्याचे प्रयत्न : रॉड्रिग्स
रायबंदर येथील कामात भरती-ओहोटीचा अडथळा : पणजी ‘स्मार्ट सिटी’चे अधिकारी रॉड्रिग्ज यांची माहिती
पणजी : रायबंदर येथे मलनिस्सारण नेटवर्क प्रकल्पाच्या कामांना विलंब झाल्यामुळे राजधानीत सुरू असलेली स्मार्ट सिटीची अन्य कामेही लांबणीवर पडत आहेत. परिणामी 31 मे पर्यंत सर्व कामे पूर्ण करणे हे आव्हानात्मक बनले आहे. तरीही मोठ्या प्रमाणात कामगारवर्ग उपलब्ध केल्यामुळे आम्ही ते लक्ष्य गाठण्याचे प्रयत्न करणार आहोत, असा विश्वास इमेजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिग्स यांनी व्यक्त केला आहे. स्मार्ट सिटीची कामे निर्धारित वेळापत्रकानुसार 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे कामांना गती देण्यासाठी अतिरिक्त कामगार तैनात केले आहेत, असे रॉड्रिग्ज यांनी सांगितले.
दिवसेंदिवस वाढती आव्हाने
तंत्रज्ञान कितीही बदलले तरी पाण्याच्या भरतीचा प्रश्न खरोखरच कामात अडथळे निर्माण करत आहे. भरती-ओहोटीची पातळी जास्त असल्याने चर खोदण्यात त्रास होत आहे. काही प्रमाणात वाहतुकीचाही अडथळा ठरत आहे, याचा परिणाम एकंदरीत कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यावर होत आहे. रायबंदरचा विचार करता, आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत, असे ते म्हणाले.
धूळ प्रदूषण, रहदारीवर नियंत्रण
या कामांमुळे या भागात मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण होत असल्याच्या स्थानिकांच्या वाढत्या तक्रारी येऊ लागल्या होत्या. त्यावर उपाय म्हणून पाणी फवारणी करण्यात येत आहे. त्यामुळे प्रदूषण बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे. त्याशिवाय रहदारी सुरळीत करण्यासाठी जंक्शनवर अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यास पोलिसांना सांगितले आहे. सांत इनेज भागातील कामे पूर्ण होण्यासंबंधी बोलताना रॉड्रिग्स यांनी, त्या भागात वाहतुकीचे प्रमाण प्रचंड आहे. तरीही त्यात सुरळीतपणा असल्याचे सांगितले. त्यामुळे कुठेही वाहतूक ठप्प झाल्याची कोणतीही तक्रार आलेली नाही. वाहतूक पोलिसांनी परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली आहे, रॉड्रिग्स म्हणाले.